जर आपल्याला मुंबईतील जंगल वाचवता येत असेल तर अशा प्रयत्न नक्कीच करायला हवा असे मत आदित्य ठाकरे यांनी आज म्हाडा मुख्यालयातील पत्रकार परिषदेत मांडले. त्यामुळे मुंबईतील मेट्रो ३ प्रकल्पातील आरे कॉलनीमध्ये प्रस्तावित कारशेड कांजूरमार्गला स्थलांतरित करण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. मेट्रो कारशेडसाठी मुंबईतील हरित पट्ट्याचे नुकसान होऊ नये असा आमचा मानस आहे.
मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचा मीदेखील वापर करतो. सध्या पूर्व पश्चिम अशी कनेक्टिव्हिटी आहे, भविष्यात दक्षिण ते उत्तर अशी कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. पण कारशेडसाठी कांजूरमार्गला भूखंडाचा पर्याय उपलब्ध असताना मुंबईतील हरितपट्टा तोडता कामा नये अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. आरे कारशेडसाठी यआआधीच कांजूरमार्गचा पर्याय आम्ही सुचवला आहे. त्यामुळे यापुढील काळात सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा विचार करूनच आपण प्रकल्पासाठीचा विचार करायला हवा. मुंबई शहरासाठीच्या विकास प्रकल्पांमध्ये पर्यावरणाचीही काळजी घेण्याची भूमिका आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यातून समोर आली.
मुंबई मेट्रो ३ च्या सध्याच्या आराखड्यानुसार आरे कॉलनी येथे मेट्रो ३ साठीची जागा प्रस्तावित आहे. त्याठिकाणी प्राथमिक कामांनाही काही प्रमाणात सुरूवात झाली आहे. मेट्रो ३ च्या सध्याच्या जागेएवजी कांजुरमार्ग येथे कारशेड हलवण्यात आले तर मेट्रोच्या खर्चात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. मेट्रो ३ चा सध्याचा मार्ग कुलाबा वांद्रे सीप्झ असा आहे. सीप्झपासून पुढची जागा ही आरे कॉलनीतील कारशेडची आहे. हे कारशेड कांजुरमार्गला हलवल्यास कांजुरमार्ग ते सीप्झ अशा फेर्या वाढताना प्रकल्पाचा खर्चही वाढणार आहे.