यंदा पुरेसा पाऊस न पडल्यामुळे राज्यावर सध्या दुष्काळाचे सावट असल्याने मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. आता मुंबईकरांवर पाणी संकट ओढवले आहे. गेले काही दिवस मुंबईच्या काही भागात पाण्याची समस्या आहे. त्यामुळे मुंबईकरांनो पाण्याचा वापर जपून करा असे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. महापालिका मुख्यालयात दिवाळीनिमित्त दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुंबईत जून आणि जुलै महिन्यात चांगला पाऊस पडला आहे. मात्र, परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने तलावांमध्ये पाण्याचा साठा प्रमाणापेक्षा कमी असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. तलावांमध्ये जलसाठा कमी असल्याने सणाच्या दिवसांत नागरिकांनी पाण्याचा अपव्यय करू नये. जलसाठा कमी असल्याने येत्या एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागू शकते, यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाणी वाचवावे, असे आवाहन महापौरांनी केले.