स्थानिक संस्था महानगरपालिका अधिकाऱ्यांकडे कोणताही ठोस पुरावा आणि खंबीर तक्रारदार नसताना गणपती कारखाने उद्धस्त करत आहेत असा सवाल उल्हासनगर येथील मूर्तीकार पंकज तातवडेकर यांनी उपस्थित केला आहे. निमित्त ठरलं आहे ते म्हणजे उल्हासनगरातील गणपती कारखान्यांवर महापालिकेनं कारवाई केल्याचं. उल्हासनगर शहरातील मराठा विभागात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती बनविण्याचे कारखाने उभे आहेत. मात्र हे गणपती कारखाने रस्त्यावर उभे राहत असल्यामुळे पालिकेमार्फत कारवाई करायला आलेलं पथक आणि गणपती कारखानेवाले यांच्यात वाद झाला. त्याचवेळी तेथील कामगारांनी संतप्त सवाल उठवले आहेत.
नक्की काय घडलं?
उल्हासनगर शहरातील कुंभारवाडा म्हणून मराठा विभाग ओळखला जातो. या मराठा विभागात दरवर्षी १५ ते २० गणपती बनविण्याचे कारखाने उभे राहतात . या कारखान्यांमधून जवळपास ४ ते ५ हजार मूर्तींची विक्री होते. यामध्ये १ फुटापासून ते १५ फुटापर्यंतच्या मूर्त्यांचा समावेश असतो. हे कारखाने रस्त्यावर येत असल्यामुळे या कारखान्याचे मंडप रस्त्यावरून हटविण्यासाठी वारंवार तक्रारी पालिकाकडे येत होत्या. या तक्रारींवरून विचार करून प्रभाग समिती ३ चे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी हे त्यांच्या पथकासह कारवाई करण्यासाठी मराठा विभागात आले होते. त्यांनी २ ते ३ गणपती कारखान्यांचे बांधलेले प्लास्टिक काढले. प्लास्टिक काढल्यानंतर सर्व गणपती मंडळ आणि त्यांचे परिवार तसेच काही सामाजिक कार्यकर्ते, मनसे कार्यकर्ते तिथे जमले आणि त्यांनी गणपतीच्या मूर्ती मंडपातून काढून रस्त्यावर ठेवल्या. मूर्ती रस्त्यावर ठेवून रास्ता अडविण्यात आला. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले. मात्र त्यानंतर पालिकेच्या पथकाने पोलिसांना बोलावत तिथून जाण्याचाच मार्ग पत्करला.
गेले ४० वर्षांपासून आहेत कारखाने
उल्हासनगर कँप क्रमांक ४ मधील मराठा सेक्शन विभागात गणपती मूर्ती तयार करण्याचे कारखाने गेल्या ४० वर्षांपासून आहेत. मात्र यापूर्वी कधीही या कारखान्यांवर महापालिकेने कारवाई केली नसल्याचं येथील कामगारांनी ‘आपलं महानगर’ला सांगितलं आहे. दरम्यान गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेकडे रस्त्याच्या कडेला मंडप बांधण्यासाठी परवानगी मागत आहोत मात्र ती देण्यात आली नाही. तसेच पर्यायी जागाही देत नाहीत अशा परस्थितीत आम्ही करायचे काय? सणाला केवळ एक महिना उरला असून मूर्ती पूर्ण करायच्या आहेत असा सवाल इथल्या कारागिरांनी विचारला आहे. तर शहरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी आमच्या तीन महिने चालणाऱ्या गणपती कारखान्यांवर इतक्या लगेच कारवाई का करण्यात आली आहे? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.