अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांच्यावर तनुश्री दत्ताने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. आत्तापर्यंत नाना पाटेकर सर्वांसमोर येऊन त्यांची बाजू स्पष्ट का करत नाहीत, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, आता राज्य महिला आयोगासमोर झालेल्या चौकशीमध्ये नाना पाटेकर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. महिला आयोगासमोर शुक्रवारी नाना पाटेकर यांची सुनावणी झाली. त्यावेळी पाटेकर यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली. काही महिन्यांपूर्वी तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. त्या प्रकरणावरून बॉलिवुड इंडस्ट्रीमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर विनयभंग किंवा अत्याचार झाल्याचे आरोप केले होते.
कसा घडला प्रकार?
२००८ साली हॉर्न ओके प्लीज या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. नाना पाटेकरांनी डान्स करताना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा दावाही तनुश्री दत्ताने केला होता. या आरोपांनंतर बॉलिवुड इंडस्ट्रीमध्ये मोठा गहजब उडाला होता. तनुश्रीनंतर अनेक अभिनेत्रींनी #MeToo या हॅशटॅगखाली आपल्यावर झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली होती. यामध्ये बॉलिवुडमधल्या अनेक प्रथितयश कलाकारांची नावं समोर आली होती. यात संस्कारी बाबू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलोक नाथ यांच्यापासून साजिद खान, अनु मलिक, विकास बेहेल यांची नावं आली होती. त्यासोबतच एम. जे. अकबर यांच्यासारखं राष्ट्रीय पातळीवरचं मोठं नाव देखील आलं.
तुम्ही हे वाचलंत का? – हाऊसफुल ४: नाना पाटेकर यांना रिप्लेस करणार हे कलाकार
अखेर नाना तनुश्री प्रकरणावर बोलले!
तनुश्री दत्ताने आरोप केल्यानंतर नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न अनेकदा करण्यात आला. मात्र, ‘वकिलाने या प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे’, असं सांगून नानांनी या मुद्द्यावर काढता पाय घेतला होता. तसेच, समोर येऊन कोणतंही स्पष्टीकरण नानांनी दिलं नव्हतं. आता मात्र, राज्य महिला आयोगासमोर झालेल्या सुनावणीमध्ये नानांना त्यांची बाजू मांडावीच लागली. यामध्ये नानांनी तनुश्री दत्ताचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण असं काहीही केलं नसून तनुश्रीने केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत आणि सत्यापासून फार लांब जाणारे आहेत, असं नानांनी त्यांच्या खुलाशामध्ये म्हटलं आहे. नाना पाटेकर यांचे वकील अनिकेत निकम यांनी नाना पाटेकर यांची बाजू शुक्रवारी महिला आयोगासमोर मांडली.
All allegations against him are false & far from the truth: Aniket Nikam, lawyer of Nana Patekar on State Women Commissions' notice which was issued to Nana Patekar after a complaint of harassment by Tanushree Dutta.
— ANI (@ANI) November 16, 2018
स्पॉटबॉयने केलेला ‘हा’ खुलासा धक्कादायक!
दरम्यान, हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या सेटवर त्या वेळी उपस्थित असलेले स्पॉटबॉय रामदास बोर्डे यांनी ‘नाना पाटेकर यांनी तनुश्रीला व्हॅनिटि व्हॅनमध्ये बोलावलं होतं,’ असा धक्कादायक खुलासा करून या प्रकरणाला नवीनच वळण दिलं आहे. ‘व्हॅनिटी व्हॅनमधून तनुश्री जेव्हा बाहेर पडली, तेव्हा ती प्रचंड वैतागली होती आणि तिने तडक कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याकडे नाना पाटेकर यांची तक्रार केली’, असं देखील स्पॉटबॉय रामदास बोर्डे यांनी म्हटल्यामुळे नाना पाटेकर अजूनच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.