जुन व जुलै या महिन्यात पाऊसाची दमदार हजेरी लागली असून शेतकरी राजा सुखावला या पावसामुळे शेतातील सर्व भागात पाणीच पाणी साचल्याने मुरुड पंचक्रोशीतील भागातील आज पासून भात लावणीला सुरुवात झाली आहे. मुरुड मध्ये आतापर्यंत १२८६मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. मुरुड तालुक्यात ३९०० हेक्टर क्षेञात भात पिकासाठी लागवड केली जाते. त्यापैकी ९० टक्के भात पिकाची लागवड करण्यात आली. मुरुड तालुक्यातील शेतकरी सुर्वणा, रुपाली, कर्जत २ व ५ , ८ चिंटु साई ,जया, तांबामैसुरी या तांदळाची लागवड मोठया प्रमाणावर शेतक–याकडुन केली जाते.
मुरुड तालुक्यात यंदा सुरुवाती पासूनच भातशेतीला अनुकूल होईल अशा प्रकारे पाऊस झाल्याने अवघ्या पंचवीस दिवसातच पेरणी करण्यात आलेली भाताची रोपे योग्य प्रकारे वाढल्याने भातशेतीच्या लावणीला प्रारंभ झाला आहे. दरवर्षी पाऊस होतो, परंतु बऱ्याच वर्षात अतिशय समाधानकारक असा पाऊस यंदा होत असल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाताची पेरणी झाल्यापासून वरून राजाने येथील शेतकऱ्यांवर कृपादृष्टी केल्याने येथील शेतकरी शेतीच्या मशागतीला लागले असून, सर्वत्र भागात भातशेतीच्या लावणीला प्रारंभ झाल्याचे चित्र दिसत आहे.मुरुड शहरातील पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीच्या मशागतीला लागले असून,रोपे तयार झालेल्या शेतकऱ्यांचे लावणीला प्रारंभ झाला आहे.
काही ठिकाणी पॉवर टिलर यंत्राच्या साहाय्याने नांगरणी करण्यात येते. त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या घरातील माणसे विशेष शेतात मशागत करत नसून, मजुरीने माणसे घेऊन भातशेतीच्या लावणी करण्याचा कलह अधिक प्रमाणात असल्याने आजच्या स्थितीत भातशेती करणे शेतकऱ्याला परवडत नसतांनाही आपल्या पूर्वजांनी शाबूत ठेवलेली काळ्या आईची मशागत करून लावणी करण्यासाठी येथील शेतकरी पुढे सरसावत आहे.