महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज, गुरुवारी सकाळी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी वाढीव वीजबिलासंदर्भातील मुद्दा राज्यपालांसमोर मांडला. यापूर्वीही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढीव वीजबिलासंदर्भात निर्णय घेण्यासाठी निवेदन पाठवले होते. आता राज ठाकरे यांनी थेट राज्यपालांकडे हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता, शिरीष सावंत यांच्यासह मनसे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला हजर होते. या सर्वांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन १० ते १५ मिनिटे चर्चा केली. राज्यपालांशी राज ठाकरे यांची ही पहिलीच भेट असल्याने सर्वांचे या भेटीकडे लक्ष लागले होते. दरम्यान, राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी भेटीचा तपशील दिला.
वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती पक्षातर्फे करण्यात आली. pic.twitter.com/N6zSuYX9ed
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 29, 2020
काय म्हणाले राज ठाकरे
राज्यपाल हे राज्याचे प्रमुख आहेत या नात्याने त्यांच्या कानावर वाढीव वीजबिलाचा मुद्दा घालण्यासाठी आज त्यांची भेट घेतल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना वाढीव वीजबिलाचा चांगलाच फटका बसला आहे. यासंदर्भात राज्य सरकारलाही वेळोवेळी सांगण्यात आले आहे. तरीही आपणही या विषयी लक्ष घालावे, अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचे राज ठाकरे म्हणाले. तसेच या विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करावी, असा सल्ला राज्यपालांनी दिला असून लवकरच यासंदर्भात त्यांची भेट घेणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. येत्या दोन दिवसांत वाढीव वीजबिलासंदर्भात निर्णय घ्यावा, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा –
Ind v/s Pak : हल्ल्याच्या भीतीनेच अभिनंदनची सुटका; पाकच्या लष्कर प्रमुखाची अशी झालेली अवस्था