पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलच्या कांदिवली ते दहिसर रेल्वे स्थानकात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरी करणार्या एका रेकॉर्डवरील आरोपीस बोरिवली रेल्वे पेालिसांनी अटक केली आहे. मुनीर ख्याजापीर सय्यद असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध मोबाईल चोरीचे चौदा गुन्हे असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याची बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने सोमवारी चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
वसई परिसरात राहणार्या एका प्रवाशाचा दादर-बोरिवली उपनगरीय लोकलमध्ये प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी चौदा हजार रुपयांचा मोबाईल चोरी केला होता. याप्रकरणी मोबाईल चोरीचा गुन्हा नोंद होताच बोरिवली रेल्वे पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच रिझवान शमी अहमद खान, इजहार अबरार बेग ऊर्फ इज्जू आणि अब्दुल लतिफ अब्दुल हमीद शेख या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत मुनीर सय्यद, बाबू आणि लल्लू या तिघांचा सहभाग उघडकीस आला होता.
गोवंडीतून अटक
लोकलमध्ये मोबाईल चोरी करणारी ही सराईत टोळी असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. इतर आरोपींचा शोध सुरु असतानाच मुनीरला गोवंडी परिसरातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या पथकातील संजय निंबाळकर, चंद्रकांत होळकर, प्रशांत जाधव आणि विकास पाटील यांनी शिताफीने अटक केली.
मोबाईल चोरणारी मोठी टोळी
मुनीरविरुद्ध चौदा मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे तर यापूर्वी अटक केलेल्या रिझवान आणि इजहारविरुद्ध प्रत्येकी दहा तर अब्दुल लतीफविरुद्ध पंधरा मोबाईल चोरीचे गुन्हे आहेत. ही टोळी कांदिवली ते दहिसर रेल्वे स्थानकात कार्यरत होती. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेस त्यांनी अनेक प्रवाशांच्या मोबाईल चोरी केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत इतर दोन आरोपी फरार असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. या आरोपींवर चोरीच्या मोबाईल विक्रीची जबाबदारी सोपविण्यात आली होती असे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.