आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती होणार का? युती झाली तर भाजपा शिवसेनेला किती जागा सोडणार? अशा चर्चा सुरू असताना आता शिवसेनेने स्वबळाची देखील तयारी केली आहे. ‘यावेळी गाफिल राहू नका जर युती तुटली तर २८८ जागा लढण्यासाठी सर्वांनी तयारीला लागा. स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा’, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. रविवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, मुंबईतील विभागप्रमुख आणि शाखाप्रमुख देखील उपस्थित होते. उध्दव ठाकरे यांनी सर्वांचे मत जाणून घेतले. त्यानंतर या बैठकीमध्ये जर युती झाली नाही तर सर्वांनी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याचे आदेश उध्दव ठाकरे यांनी दिले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरु आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असली तरी अद्याप जागा वाटपाचा तिढा मात्र काही सुटला नाही.
हेही वाचा – शिस्तीचे वळण राजांना लागत आहे; सामनातून उदयन राजेंवर टीका
शिवसेनेला हवा ५०-५० चा फॉर्म्यूला
दरम्यान, खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेला ५०-५० चा फॉर्म्यूला हवा आहे. भाजप मात्र शिवसेनेला १२० च्या वर जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे येत्या १९ सप्टेंबरपर्यंत युती होणार की नाही? आणि युती झाली तर कुणाला किती जागा सोडल्या जाणार? याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.