घरमुंबईविद्यापीठांमधील उर्दू भाषा विभागाच्या पुनरुज्जीवनासाठी पाठबळ देणार- राज्यपाल

विद्यापीठांमधील उर्दू भाषा विभागाच्या पुनरुज्जीवनासाठी पाठबळ देणार- राज्यपाल

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराजांनाही फारसी भाषा अवगत होती. आज फारसी आणि उर्दू भाषेतील दुवे कमकुवत होत आहेत. त्यामुळे उर्दू भाषा आणि सर्व प्रादेशिक भाषांचे प्रचार आणि संरक्षण करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

राज्यातील विद्यापीठांमध्ये उर्दू आणि फारसी भाषा विभागांच्या पुनरुज्जीवनासाठी पाठबळ देण्यात येईल, अशी ग्वाही राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिली. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयमार्फत ‘हमारी धरोहर’ योजनेंतर्गत आयोजित ‘मुशायरा’ कार्यक्रमास राज्यपाल यांनी हजेरी लावली त्या दरम्यान ते बोलत होते. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित या कार्यक्रमास केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशिष शेलार, अभिनेते अनू कपूर यांच्यासह अनेक नामांकित उर्दू शायर उपस्थित होते.

फारसी आणि उर्दू भाषेतील दुवे कमकुवत

इंग्रजी आणि अन्य भाषांमध्येही काव्य वाचनाचे कार्यक्रम होत असतात. मात्र, उर्दू मुशायऱ्यांमधील जिवंतपणा, मजा, विद्वत्ता, सौंदर्याची सर इतर कोणत्याही भाषेतील काव्यात नाही. महात्मा गांधीजींनी सत्य, अहिंसा आणि सार्वजनिक जीवनातील नैतिक मुल्यांचे प्रतिनिधित्व केले. ही मूल्ये शाश्वत आहेत. मुशायरा कार्यक्रम महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासह सामाजिक-सांस्कृतिक सद्भावना आणि बंधुता वाढण्यास मदत करेल. छत्रपती शिवाजी महाराजांनाही फारसी भाषा अवगत होती. आज फारसी आणि उर्दू भाषेतील दुवे कमकुवत होत आहेत. त्यामुळे उर्दू भाषा आणि सर्व प्रादेशिक भाषांचे प्रचार आणि संरक्षण करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

- Advertisement -

उर्दू शायरांची महत्वाची भूमिका

बॉलीवूडवरील उर्दूच्या प्रभावामुळे भारतीय चित्रपट आणि गीते इजिप्त, इंडोनेशिया, खाडी देश, रशिया आणि इतर देशांमध्येही पोहोचू, मान्यता मिळवू शकले असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. उर्दू शायरांनी भारतीय सिनेमा आणि उर्दू कविता लोकप्रिय करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मुशायऱ्याचा अनेक शतकांचा खूप जुना आणि मनोरंजक इतिहास आहे. हे स्व-अभिव्यक्तीचे आणि निरोगी साहित्यिक मनोरंजनाचे एक सशक्त साधन आहे. यामध्ये विनोद, दुःख, देशभक्तीची भावना आहे तसेच अध्यात्मही आहे. मुशायरा हा समाजातील विरोधाभास, जटिलता, ढोंगीपणा याच्या दर्शनाचा आरसा आहे. मुशायरा लोकशाहीची भावना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भावना कायम राखते असं ही त्यांनी सांगितले.

मुशायऱ्याला नवा आयाम देण्यासाठी प्रयत्न करा

युवक आणि महिला कवींनी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून मुशायऱ्याला नवा आयाम देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जगातील मुशायरा प्रेमींपर्यंत मुशायरा पोहोचविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. मुंबईसारख्या शहरात दरवर्षी जगातील शायर आणि गीतकारांना आयोजित करून जागतिक स्तरावरील मुशायरा कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -