‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनी सहसा कोणत्याही भावना त्याच्या चेहऱ्यावर येऊ देत नाही. मात्र, यंदाच्या आयपीएल मोसमात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे धोनीची वेगळी बाजू पाहायला मिळत आहे. तो कधी रागावलेला, कधी निराश दिसत आहे. चेन्नईच्या संघाला यंदाच्या मोसमात ११ पैकी केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे हा संघ प्ले-ऑफच्या स्पर्धेतून बाहेरच आहे. त्यातच धोनीची कामगिरीही निराशाजनक ठरली आहे. मात्र, असे असतानाही उर्वरित सामन्यांत संघाबाहेर बसण्यास धोनी तयार नाही. ‘कर्णधार म्हणून मी पळपुटेपणा करू शकत नाही,’ असे मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर धोनी म्हणाला.
उर्वरित सामने फायदेशीर ठरू शकतील
आम्ही प्ले-ऑफच्या स्पर्धेतून बादच झालो आहोत. मात्र, पुढील वर्षीच्या तयारीसाठी आम्ही उर्वरित तीन सामन्यांचा उपयोग केला पाहिजे. पुढील मोसमात आमचे फलंदाज कोण असणार? अखेरच्या षटकांमध्ये कोणता गोलंदाज चांगली कामगिरी करू शकतो? हे जाणून घेण्यासाठी आम्हाला हे तीन सामने फायदेशीर ठरू शकतील. आमचे खेळाडू दबाव योग्यपणे हाताळतील अशी मला आशा आहे. मी उर्वरित सर्व सामने खेळणार आहे, कारण कर्णधार म्हणून मी पळपुटेपणा करू शकत नाही, असे धोनी म्हणाला.
मुंबईने केली चेन्नईवर मात
चेन्नई संघाने यंदाच्या मोसमात निराशाजनक खेळ केला असून शुक्रवारी मुंबई इंडियन्सने त्यांना १० विकेट राखून पराभूत केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला केवळ ११४ धावाच करता आल्या. मुंबईने हे ११५ धावांचे आव्हान १२.२ षटकांतच गाठत सामना जिंकला. मुंबईकडून ईशान किशन (नाबाद ६८) आणि क्विंटन डी कॉक (नाबाद ४६) यांनी अप्रतिम फलंदाजी केली. हा मुंबईचा १० सामन्यांत सातवा विजय ठरला.