राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ९ आमदार उपस्थित होते. यापैकी ८ आमदार टप्प्याटप्प्याने शरद पवार यांच्याकडे परतले आहेत. यापैकी अमळनेरचे आमदार अनिल पाटील आणि शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांना आज ग्रँड हयात या हॉटेलमध्ये आणण्यात आले आहे. यानंतर या आमदारांनी २३ नोव्हेंबर (शनिवारी) घडलेला सर्व प्रसंग कथन केला आहे. “त्या दिवशी सकाळी अजित पवार यांनी आम्हाला फोन करुन बैठकीसाठी बोलवले होते. गटनेत्यांनी बैठक बोलविल्यामुळे आम्ही पोहोचलो होतो. मात्र तिथून आम्हाला राजभवनावर नेण्यात आले. शिवसेनेसोबत आपली चर्चा निष्फळ ठरत असून राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी भाजपसोबत सत्ता स्थापन करत आहोत.”
अजित पवारांनी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन होणार नाही, असे सांगितल्यामुळे या आमदारांना पक्षाचा हा अधिकृत निर्णय असल्याचे वाटले होते. मात्र त्यानंतर पाच आमदारांना विमानतळावरुन दिल्लीत नेण्यात आले. तिथे गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा हा अधिकृत निर्णय नसल्याचे आमदारांना कळले. त्यानंतर आम्ही शरद पवार यांच्याशी दुरध्वनीवर बोलून दिल्लीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला. या सुटकेसाठी आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, अशी प्रतिक्रिया आमदार अनिल पाटील यांनी दिली.
2 out of the 4 MLAs of NCP – Anil Patil (3rd from right in the picture, in yellow shirt) & Daulat Daroda (5th from right in the picture, in yellow shirt), who were reportedly missing, have been brought to Mumbai from Delhi. The 2 MLAs were staying in a hotel in Haryana's Gurugram pic.twitter.com/NxNGzCEj4I
— ANI (@ANI) November 25, 2019
आम्ही पक्षासोबतच आहोत, आमदारांचा दावा
आज मुंबईत परतल्यानंतर या दोन्ही आमदारांनी आपल्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. आम्हाला ज्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. तिथे १००-२०० भाजपचे कार्यकर्ते होते. साध्या वेषात पोलीस पाळत ठेवून होते. त्यामुळे आम्ही घाबरलो होतो. माध्यमावर आम्ही फुटलो आहोत, पळून गेलो आहोत, अशा बातम्या सुरु होत्या. मात्र आम्ही शरद पवार यांना फोन करुन पक्षासोबतच असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शरद पवार यांनी आम्हाला इथून सोडवण्यासाठी आपले कार्यकर्ते कामाला लावले. त्यानंतर आम्ही आज कसेबसे मुंबईत पोहोचलो आहोत, असे दोन्ही आमदारांनी सांगितले.