कॉर्पोरेट करात कपात करण्याच्या धाडसी निर्णयामुळे भारत आता विदेशी गुंतवणुकीसाठी अधिक आकर्षक ठिकाण झाला आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मंगळवारी केले.गेल्या शुक्रवारी केंद्र सरकारने कॉर्पोरेट करात १० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. मागील २८ वर्षांतील ही सर्वांत मोठी कर कपात ठरली. वृद्धीदराचा सहा वर्षांचा नीचांक आणि बेरोजगारीत ४५ वर्षांचा उच्चांक झाल्यामुळे सरकारने हा निर्णय जाहीर केला. या पार्श्वभूमीवर शक्तिकांत दास यांनी मंगळवारी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली.
त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली. शक्तिकांत दास यांनी सांगितले की, कॉर्पोरेट करात एवढी मोठी कपात करणे हा अत्यंत धाडसी निर्णय आहे. आशिया आणि इतर विभागातील उगवत्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताचा कॉर्पोरेट कराचा दर आता अधिक स्पर्धात्मक झाला आहे. थेट परकीय गुंतवणुकीसाठी भारत आता अधिक आकर्षक ठिकाण झाला आहे.
देशांतर्गत गुंतवणुकीबाबत दास यांनी सांगितले की, त्यांना आता अधिक रोख रक्कम हाताशी मिळणार आहे. त्यातून ते अधिक भांडवली खर्च करण्यास सक्षम होतील. ते आता अधिक गुंतवणूक करू शकतील. काहींना आपले कर्ज कमी करता येईल. त्यातून त्यांच्या ताळेबंदास बळ मिळेल.
पतधोरण बैठक ऑक्टोबरमध्ये
वित्तमंत्र्यांच्या भेटीबाबत दास यांनी सांगितले की, पतधोरण समितीच्या बैठकीपूर्वीची ती एक औपचारिक बैठक होती. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी वित्तमंत्र्यांची भेट घेण्याची दीर्घ परंपरा आहे. याच धर्तीवरील आजची भेट होती. पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक १ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ४ ऑक्टोबरला समिती आपला निर्णय जाहीर करील. समितीकडून आणखी दरकपातीची अपेक्षा आहे.