घरमुंबईक्रांतीकारक बिरसा मुंडा

क्रांतीकारक बिरसा मुंडा

Subscribe

आज बिरसा मुंडा यांचा स्मृति दिन. बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतीकारक होते. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. 19 व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींकडून इंग्रज सरकारविरुद्ध जनआंदोलने केली, त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात या आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसा मुंडा यांनाच जाते.

बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्ह्यातील उलीहातू या गावी झाला. त्यांच्या पालकांचे ते प्रथम अपत्य होते. त्यामुळे मुंडा जमातीच्या परंपरेनुसार त्यांचे नामकरण झाले. त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात व्यतीत झाले. त्यांचे वडील जनावरे चरवण्याचे काम करायचे. तेही वडिलांसोबत रानात जावून धनुर्विद्या व नेमबाजीचा सराव करायचे. बालपणीच त्यांचा नेम फार चांगला होता. त्यांचा लगाव ख्रिश्चन मिशनरीशींही होता. त्यांची प्रतिभा पाहुन एका पारधी नेत्याने त्यांना शाळेत टाकण्याचा सल्ला दिला. परंतु त्यासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागणार होता. त्यांच्या वडिलांनी त्यांचे धर्मांतरण करून त्यांचे नाव डेविड केले. त्याचा दाखला जर्मन मिशन स्कूल येथे झाला. परंतु तेथे धार्मिक सक्तीमुळे त्यांनी शाळा सोडली व ते प्रसिद्ध वैष्णव भक्त आनंदानंद पांडे यांच्या संपर्कात आले.

- Advertisement -

वाचन व लेखन येत असल्याने त्यांनी महाभारत, रामायण व गीता असे अनेक हिंदू धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. त्यांच्या सोबत राहून इंग्रजांच्या काळ्या धोरणाचा त्यांना फार तिरस्कार यायचा. बिरसा मुंडा यांनी 1900 मध्ये इंग्रजांविरूद्ध विद्रोह करण्याची घोषणा केली व म्हटले ‘आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वांविरुद्ध विद्रोहाची घोषणा करतो. आम्ही कधीच ब्रिटिशांच्या कायद्यांना मानणार नाही. आम्ही इंग्रजांचे अधिपत्य स्वीकारत नाही. जो इंग्रज आमच्याविरुद्ध उभा राहील त्यास आम्ही यमसदनी पाठवू. यामुळे संतप्त ब्रिटिश सरकारने आपली सेना बिरसा मुंडा यास पकडण्यासाठी पाठविली, बिरसा मुंडास पकडून देणार्‍यास त्या काळी 500 रुपये बक्षीस जाहीर केले.

बिरसा मुंडा यांनी विविध जमातीच्या गटांना एकत्र आणले. त्यांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रेरित केले. इंग्रज सरकारने विद्रोहींचे दमन करण्यासाठी 3 फेब्रुवारी 1900 ला हल्ला करून विद्रोहीची ठिकाणे उद्ध्वस्त केली व बिरसा मुंडा यास अटक केली. त्यांच्यासोबत 460 आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आली. 9 जून 1900 रोजी रहस्यमयरित्या त्यांचा मृत्यू झाला होता. काहींच्या मते इंग्रजांनी त्यांना फासावर चढवले तर इंग्रजांनी त्यांच्या मृत्यूचे कारण प्लेग सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -