आज महात्मा गांधी यांची १५० वी जयंती देश आणि राज्यात साजरी करण्यात येत आहे. गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल केल्याचे पहायले मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देखील आज मुंबईमध्ये सरकारच्या विरोधात मौनव्रत आंदोलन पुकारण्यात आले होते. शिस्त, स्वच्छता आणि साधेपणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार चांगलेच प्रसिद्ध आहेत. यावरूनच आज अजित पवार यांचा काही वेळासाठी पारा चढल्याचे पहायला मिळाले.
म्हणून अजित दादांचा पारा चढला
त्याचे झाले असे की, राष्ट्रवादीच्यावतीने मंत्रालायाशेजारील गांधीजींच्या पुतळ्यासमोर सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जंयत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभर धरणे आणि मौनव्रत आंदोलन करण्यात आले. मुंबईत झालेल्या आंदोलनाला अजित पवार यांच्यासमवेत पक्षाने अनेक नेते सहभागी झाले होते. मात्र यावेळी कार्यकर्त्यांकडून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे शासकीय निवासस्थान बी ४ येथे गादी, लोड, आणि स्टेज उभारण्यात आले होते. मात्र त्यावेळी तिथे आलेल्या दादांनी आंदोलनासाठी गादी, लोडची काही गरज नसून आपण पुतळ्याजवळ जमिनीवर बसूनच आंदोलन करू, असा पवित्रा घेतला. आपल्याला आंदोलन करायचे असून त्यामध्ये कोणतीही सरबराई नको. त्यामुळे गादी, लोड नाकारून जमिनीवर बसलेल्या अजित दादांसोबत इतरही नेत्यांना जमिनीवर बसणे भाग पडले.
सुरुवातीला महात्मा गांधींजींच्या पुतळयाला विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. ९ ते १२ वाजेपर्यंत धरणे आणि मौनव्रत आंदोलन केल्यानंतर माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्रींजींच्या पुतळयालाही पक्षाच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली. मंत्रालयाजवळ असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळयासमोर प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विक्रम काळे, आमदार विदयाताई चव्हाण आदी नेत्यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
सुप्रिया सुळे यांचे पुण्यात मौनव्रत
पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली तोंडाला काळी फित बांधून सरकारचा निषेध म्हणून मौनव्रत धारण करत आंदोलन करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.