राज्यातील एसटी कर्मचारी एसटीचे शासकीय सेवेत विलिनीकरण करण्याबाबतच्या मागणीवर ठाम असून गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर ठिय्या मांडला आहे. परंतु राज्यात सध्या कोरोना आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशामध्ये रुग्णांची संख्या वाढू नये आणि एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना आझाद मैदान खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून केवळ सकाळी ५ ते संध्याकाळी ५ पर्यंत आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे.
मुंबईमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १४४ कलम लागू करण्यात आले आहेत. रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आले आहे. अशाच एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी आझाद मैदान सोडण्याची सूचना दिली आहे. सध्यातरी एसटी कर्मचाऱ्यांनी यावर प्रतिक्रयिा दिली नाही. परंतु मैदान संपूर्ण खाली करण्याच्या सुचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. सकाळी ५ ते संध्याकाळी ५ पर्यंत आंदोलन करण्याची परावनगी मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. यामध्ये मोजक्या वेळेत आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात यावे, इतर आंदोलकांना बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत १४४ कलम लागू करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणाला कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात येत आहे.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गेल्या ७० दिवसापासून सुरु आहे. आतापर्यंत ७०० कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. महामंडळाच्या कारवाईनंतर आता अनेक एसटी कर्मचारी कामावर परत येत आहे. परंतु परतण्याची मुदत संपल्यामुळे या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्यास आगार प्रमुखांनी नकार दिला आहे. मध्यवर्ती कार्यालयाकडून परतीची सूचना दिल्यानंतरच या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात येणार आहे.
राज्यात आतापर्यंत ११ हजार ८ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर एकूण ७८३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. २ हजार ४७ एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा रुजू होण्याचे आवाहन केले होते. तसेच कर्मचाऱ्यांना ३ वेळा संधी देण्यात आल्या होत्या आता या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यात येणार नाही असे अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा : …मग लोक त्यांनाच तारे दाखवतात, उद्धव ठाकरेंचा मीडियासमोर येत विरोधकांवर निशाणा