मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (cm uddhav thackeray) नव वर्षाचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलंय. 500 चौरसफुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा आज केलीय. शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच फेसबुकच्या माध्यमातून जनतेसमोर आलेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर परखड मत व्यक्त केलंय. जर एखादं काम आपण केलं तर त्याची जाहिरात करायची हे मला स्वतःला पटत नाही. राजकारणात काही केलं तर भ्रष्टाचार केला असं म्हणतात आणि काही नाही केलं तर काहीच नाही केलं म्हणतात. अनेक जण वाटेल ते सांगतात, आम्ही तुमच्यासाठी तारे तोडून आणू, आम्ही तुमच्यासाठी चंद्रावरती उड्डाणपूल बांधून देऊ. ज्या काही गोष्टी होण्यातल्या नसतात त्या ते सांगतात. लोक फसतात आणि मतं देऊन मोकळी होतात. मग पाच वर्ष काही बोलायचं नाही. तुम्ही बोलला होतात नाही की आम्ही तारे तोडून आणू, निवडणुकीत असं बोलावं लागतं, असं मग सांगितलं जातं. मग लोक त्यांनाच तारे दाखवतात, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय.
सगळ्यांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय. आजपासून सुरू झालेलं नवी वर्ष सर्वांना सुखाचं, समानाधाचं, भरभराटीचं जावो. अनेकांना वाटलं असेल मी टीव्हीवरती दिसलो म्हणजे फक्त कोरोनावर बोलणार आहे. पण मी आज कोरोनावरती बोलणार नाहीये. आवश्यकता लागू नये, पण लागली तर काही दिवसांनी बोलेन. आजचा हा विषय फार महत्त्वाचा आहे. मला मुंबईकर, शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मनोमन आनंद होतोय. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असताना आपली जी काही पाळंमुळं आहेत ती विसरून चालणार नाही, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय.
1966 पासून मुंबईत जन्माला आलेली शिवसेना ही आज कित्येक वर्ष मुंबईकरांच्या आशीर्वादानं मुंबई सांभाळत आहे. आमच्या घराण्याची ही चौथी पिढी आहे. माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रणी होते. जे पाच महत्त्वाचे नेते होते, त्यातले माझे आजोबा हे शिलेदार होते. माझ्या वडिलांची, शिवसेनाप्रमुखांची काही ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. मी तुमच्यासमोर आहे आणि चौथी पिढी म्हणजे आदित्य आहे. जे काम मुंबईकरांवरचं प्रेम म्हणून शिवसेनाप्रमुखांनी सुरू केलं. तेच आज आम्ही पुढे नेतोय. मला तुमच्यासारखे सगळे शासनातले आणि संघटनेतले सहकारी मिळालेले आहेत, असंही मुख्यमंत्री म्हणालेत.
मला तेही दिवस आठवतात. रस्त्यांची कामं कशी सुरू आहेत, नाल्यांची कामं कशी सुरू आहेत हे शिवसेनाप्रमुख स्वतः जाऊन पाहायचे. हे पाहत पाहत मी मोठा होत असताना मीसुद्धा रस्त्यांची कामं, साधारणतः ही कामं मध्यरात्रीनंतर सुरू होतात. आता तर दिवसा पण आपण करतोय. नालेसफाईचं काम त्या ठिकाणी नाल्यात उतरून पाहिलंय. मग दहिसर नदीचं काम असेल किंवा आणखी कुठलं काम असेल. माझा पूर्ण ताण कमी आदित्यने केलेला आहे. कर म्हटल्यानं म्हणजे नुसते करच भरायचे काय, जे काम आपलं आहे ते आपण केलेच पाहिजे. या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करा, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्देशून संबंधित अधिकाऱ्यांना म्हणालेत.