काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला असून
भाजपनं गुंडगिरी केल्याचा नाना पटोलेंनी आरोप करत देवेंद्र फडणवीसांच्या घरी कार्यकर्ते पत्र धाडणार असल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या घरी कार्यकर्ते पत्र धाडणार
भाजपनं गुंडगिरी केल्याचा आरोप यावेळी पटोलेंनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन झाल्यानंतर आता काँग्रेस उद्यापासून शिवजयंतीपर्यंत फडणवीसांच्या घरी पत्र पाठवणार असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय. भाजपच्या व्यवस्थेपर्यंत हा वाद जोपर्यंत जात नाही. तोपर्यंत उद्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपर्यंत आम्ही विरोधी पक्ष नेत्यांच्या घरी पत्र पाठवणार आहोत. तसेच कार्यकर्त्यांच्या हाताने त्यांच्या घरी पाठवणार आहोत, असं नाना पटोले म्हणाले.
या पत्रात असे म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र दिल्लीचे तख्त आणि अहंकारी इंग्रजांसमोर झुकला नाही याचा इतिहास साक्षी आहे. तुमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगा की शेतकऱ्यांचा अपमान केल्याबद्दल देशाची माफी मागावी लागली, तशी महाराष्ट्राच्या अपमानाबद्दल माफी मागणे चांगले राहिल. दिल्लीच्या सत्तेसमोर गुडघे टेकून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळू नका, महाराष्ट्राची जनता कधीही माफ करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त क्षमा मागून तुमच्या पापाचे प्रायश्चित करा.
राज्याच्या सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर भाजपने ज्या पद्धतीने केंद्रातल्या ईडी आणि सीबीआयासारख्या यंत्रणांचा वापर करून राज्याला आणि राज्याच्या सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र जे त्यांनी रचलं. त्यामुळे राज्याची बदनामी मोठ्या प्रमाणात झाली. महाराष्ट्र हे भ्रष्टाचारी राज्य आहे, अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या घटनेपासून भाजपाने निर्माण केलेलं हे चक्रव्यूह आहे. हे चक्रव्यूह आपल्या निदर्शनास येतं. भाजप हे धुतल्या तांदळासारखे असून भ्रष्टाचार नसल्याची त्यांची भूमिका होती. खासदार संजय राऊत यांनी सुरू केलेल्या मोहिमेला खऱ्या अर्थाने काँग्रेसने पाठींबा दिला. आमच्या भूमिका स्पष्ट आहे की, भाजपच्या काळामध्ये भ्रष्टाचारी व्यवस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राला लूटण्याचं काम करण्यात आलं. त्याचप्रमाणे यामध्ये काही लोकांची नावे घेण्यात आली.
संजय राऊतांनी केलेले आरोप सिद्ध झाले पाहीजेत
मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी सांगू इच्छितो की, तातडीने इडब्लूकडे हे प्रकरण देऊन गृहमंत्र्यांनी तातडीने यामध्ये लक्ष घालवं. संजय राऊतांनी केलेले आरोप सिद्ध झाले पाहीजेत. कारण राज्यात आपलं सरकार आहे. त्यामुळे त्यांच्या काळातील भ्रष्टाचार हा उघडकीस आला पाहीजे, ही काँग्रेसची मागणी आहे.
खासदार संजय राऊतांनी केलेल्या आरोपांची तातडीने चौकशी सुरू व्हावी आणि गृहमंत्र्यांनी सातत्याने यामध्ये लक्ष द्यायला हवं. कोकणात उद्धव ठाकरे यांचे १९ बंगले असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु संजय राऊतांनी एकही नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्य सरकार असताना या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि जे खरं आहे ते लोकांसमोर यावं, ही काँग्रेसची मागणी आहे, असं नाना पटोले म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे हे आंदोलन करत होते. तेव्हा त्यांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होतं. यावर पटोले म्हणाले की, याबाबतीत आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत. त्यांचं तोंड ज्या पद्धतीने बंद करण्यात आलं होतं. त्याचा अधिकार कोणालाही नाहीये. त्यामुळे आम्ही त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत.
हेही वाचा : दाऊद, राजन गेले आता ईडी, सीबीआयकडून खंडणी वसुलीचे काम : अतुल लोंढे