मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर आज ईडीने छापेमारी केली आहे. पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. या संपत्तीची एकूण किंमत 6 कोटी 45 लाख इतकी असल्याची माहिती ईडीने दिली आहे. मेसर्स पुष्पक बुलियनशी संबंधित प्रकरणावर ईडीने ही छापेमारी केली आहे. ईडीच्या या कारवाईनंतर आता राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या कारवाईवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. “राजकीय आकसापोटी हा कार्यक्रम भाजपने हाती घेतलाय” अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.
पाटणकर यांच्यावरील ईडी कारवाईवर पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, “केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर हा या देशातील सध्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. दिलेली आकडेवारी जर खरी असेल तर ती आकडेवारी स्वच्छपणे सांगतेय की, फक्त राजकीय आकसापोटी हा कार्यक्रम भाजपाने हाती घेतला आहे. पाच दहा वर्षांपूर्वी ईडी नावाची संस्था कोणाला माहित नव्हती, मात्र ईडी आता गावा गावात पोहचली आहे. या सर्व यंत्रणांचा गैरवापर सध्या सुरु आहे, बघू आता त्याला काही पर्याय निघतोय का” अशा शब्दात शरद पवार यांनी श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपला हे महागात पडेल – नाना पटोले
श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईवर आता काँग्रेसचे नेते आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील तीव्र शब्दात संपात व्यक्त केला आहे. “केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर केला जात असून त्या त्रास देत आहेत. मात्र, सरकारला धोका नाही. मात्र भाजपला हे महागात पडेल,” असा इशारा नाना पटोले यांनी दिली आहे.
“देशात सध्या महागाई वाढतेय, देशातील जनता त्रस्त आहे. यावरचे लक्ष हटविण्यासाठी हे सगळे चालले आहेत. ईडीच्या कारवाईतून काही बाहेर पडतेय का? तर काहीही नाही. केवळ त्रास देण्यासाठी हेच चाललं आहे. छगन भुजबळ यांच्याबाबत काय झालं. काही नाही झालं, केवळ त्यांना तुरुंगात डांबलं गेलं” असं देखील नाना पटोले म्हणाले आहेत.