भाजपा आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेने बलात्कार आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये तथ्य आढळले आहे. परंतु नवी मुंबई पोलिसांनी पुरावे सापडत नसल्याचे नमूद करणारा ए समरी अहवाल शुक्रवारी उच्च न्यायालयात सादर केला आहे. त्यामुळे गणेश नाईकांना याप्रकरणातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी उच्च न्यायालयाने ही प्रकरणं लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश कनिष्ठ न्यायालयाला दिले आहेत.
गणेश नाईकांविरोधात तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरून दोन गुन्हे दाखल करण्य़ात आले आहेत. यातील पहिला गुन्हा बलात्काराचा असून दुसरा शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्ह्याचा आहे. यातील पहिल्या प्रकरणात जुलै आणि दुसऱ्या प्रकरणात सप्टेंबर महिन्यात ए समरी अहवाल सादर करण्यात आल्याचे सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयात सांगितले.
नाईकांविरोधात दोन्ही गुन्हे राजकीय हेतूने दाखल केले आहेत. कोणत्याही राजकीय व्यक्तीविरोधात दाखल गुन्हे विनाकारण प्रलंबित ठेवले जात आहेत. नाईक यांच्याविरोधातही दोन्हे गुन्ह्यांत पोलिसांनी ए समरी अहवाल सादर केला आहे. कनिष्ठ न्यायालयाने दोन्ही प्रकरणात नाईकांना नोटीस बजावली आहे. परंतु त्यानंतर काहीच झाले नाही. असे नाईक यांचे वकील अशोक मुंदरगी यांनी न्यायालयात सांगितले. तसेच यावेळी कनिष्ठ न्यायालय़ात दोन्ही प्रकरणे लवकराच लवकर निकाली काढण्याची विनंती केली, ही विनंती मान्य करत न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाला दोन्ही प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नाईक यांनी दाखल केलेली याचिका निकाली काढली.
गणेश नाईक यांच्यावर लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असलेल्या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीडी पोलीस ठाण्यात पीडित महिलेने याबाबत तक्रार दिली होती. गणेश नाईक यांच्याबरोबर १९९३ पासून लिव्ह इन रिलेशनमध्ये संबंध असून आपल्याला एक १५ वर्षांचा मुलगा देखील असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. या मुलाचा स्वीकार करण्यास गणेश नाईक यांनी नकार दिला असून आम्हाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. आपल्या मुलाला नाईकांचे नाव मिळावे आणि संपत्तीत अधिकार मिळावा अशी आपली मागणी असून या मागणीमुळे गणेश नाईक हे आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे महिलेने म्हटले आहे.
सीबीडीतील गणेश नाईक यांनी त्यांच्या कार्यालयात मार्च 2021 मध्ये आपल्यावर रिव्हॅालव्हर रोखले आणि ठार मारण्याची धमकी दिली होती, अशी तक्रार या महिलेने सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच महिलेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नवी मुंबई पोलिसांना पत्र लिहून स्वतःच्या आणि आपल्या मुलाला सुरक्षा पुरविण्याची विनंती केली आहे. पीडित महिलेने नेरूळ पोलीस ठाण्यात गणेश नाईक यांच्याविरोधात याआधी तक्रार दिली होती.