आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांच्या राजभवनात घुसून त्यांचा चहा न पिता आणि त्यांची बिस्कीट न खाता त्यांना विचारा कारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करता. त्यामुळे आधी कारे तिथे विचारा, अशा शब्दांत आव्हान देत संजय राऊत यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे. आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी आशिष शेलार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.
गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांकडून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊतांनी आशिष शेलारांवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, “राज्यपाल यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या आधी आणि नंतर आता विरोधी पक्ष काय करते ते पाहा, अशा इशारा संजय राऊत यांनी दिला. हे आरे ला कारे करतात ना त्यांनी आधी राज्यपालांना जाऊन कारे करा”
“भाजपा मुंबईचे अध्यक्ष काल सांगत होते, आम्ही कर्नाटकच्या आरेला कारे करू. आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांच्या राजभवनात घुसून त्यांचा चहा न पिता आणि त्यांची बिस्कीट न खाता त्यांना विचारा कारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करता. त्यामुळे आधी कारे तिथे विचारा. कारे तुम्ही छत्रपतींची बदनामी करता हे विचारा. तुमच्या मनगटात तेवढी हिंमत नाही. रोज उठताहेत शिवरायांचा अपमान करत आहेत. रोज उठून छत्रपतींचा इतिहास तुडवत आहेत”, अशा शब्दांत संजय राऊतांनी आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला.
“कर्नाटक-महाराष्ट्र दोन्ही बाजून तणावाचे वातावरण निर्माण करुन नये, होऊ नये. याविषयात महाराष्ट्र सरकारची भूमिका समजून घ्यावी लागेल. महाराष्ट्र सरकारची भूमिका स्पष्ट आहे की, आमचा अधिकार त्या गावांवर आहे आणि त्याबाबत सर्वोच्च न्यायालयातही आपली भूमिका स्पष्ट आहे. कुठल्याही पक्षाचं सरकार असो तरी या भूमिकेत बदल केलेला नाही याचा आनंद आहे. शिंदे फडणवीस सरकारने एक टप्पा पुढे जाऊन त्या भागात काही योजना पोहचवण्याचा निर्णय घेतला आहे. जत तालुक्याच पाण्यासंदर्भातील योजना पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. सामजस्याने हा विषय सुटला पाहिजे. कुठल्याही बाजूने आरे झालं तर महाराष्ट्राकडून कारे होईल. महाराष्ट्राकडून कारे आम्ही करूचं” अशा इशारा आशिष शेलार यांनी दिला होता.
हेही वाचा – गुजरात निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधानांनी बाजी लावली; संजय राऊतांचा टोला