घरताज्या घडामोडीबाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटेंची आत्महत्या

बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटेंची आत्महत्या

Subscribe

आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ, सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे- करजगी यांनी सोमवारी आत्महत्या केली. शीतल आमटे-करजगी काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. शीतल यांनी विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. डॉ. शीतल या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या.

डॉ. शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोन तासातच हे फेसबुक लाइव्ह डिलीट करण्यात आलं होतं. डॉ. शीतल आमटे यांच्या या फेसबुक लाइव्हनंतर अनेक चर्चांना ऊत आला होता. त्यानंतर आमटे कुटुंबांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात शीतल आमटेंनी केलेले आरोप फेटाळून लावले होते.

- Advertisement -

‘संपूर्ण आमटे कुटुंब बाबा आमटेंच्या कार्याशी मागील तीन पिढ्यांपासून समरस आहे. आमच्या कुटुंबातील डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आमच्या कार्यात योगदान दिले आहे. तथापि, त्या सध्या मानसिक ताण, नैराश्याचा सामना करीत आहेत. त्यांनी अलीकडेच समाज माध्यमांवर तशी स्पष्ट कबुलीही दिली आहे. त्यांच्या निवेदनामुळे कोणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून आमटे परिवार हे संयुक्त निवेदन परस्पर विचारविनिमय करून प्रस्तुत करीत आहे,’ असे त्या निवेदनात स्पष्ट केले होते.

डॉ. शीतल आमटे या विकास व भारती आमटे यांच्या कन्या होत्या. आमटे कुटुंबियांचा समाजसेवेचा वारसा त्यांनीही जोपासला होता. २००३ मध्ये नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं त्यांनी शिक्षण घेतलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आनंदवनातच काम करण्याचा निर्णय घेतला. शीतल आमटे या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. डॉ. शीतल यांनी आठ तासांपूर्वी एक कॅन्व्हास पेंटिग ट्विट केले होते. ‘युद्ध आणि शांतता’ असं त्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

- Advertisement -

डॉक्टरीसेवा करत असतानाच सोशल आंत्रप्रनरशिप अभ्यासक्रम पूर्ण करून हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचं वित्त नियोजन करणं असो की आनंदवनला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवणं असो, अपंगांसाठी ‘निजबल’ आणि बेरोजगार युवकांसाठी ‘युवाग्राम’ उपक्रम राबवणे असो, ‘आनंद मूकबधिर विद्यालय’ आणि ‘आनंद अंध विद्यालय’ या शाळांचं डिजिटलायझेशन असो किंवा मियावाकी पद्धतीने चार जंगलं वसण्याचं पर्यावरणीय योगदान असो, आमटे कुटुंबियांचा समाजसेवेचा वारसा डॉक्टर शीतल आमटे, सशक्तपणे पुढे चालवत होत्या.

ग्रामीण संस्कृतीचे रक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळून तरुणाईचे शहराकडे पलायन थांबवणं, हा ध्यास घेतलेल्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांना आनंदवनला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवायचं होतं. तांत्रिक, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या खेड्यांनाच सक्षम करणारा हा उपक्रम असून सौर ऊर्जा, ‘हेल्थ एटीएम’, उपक्रमशीलतेला या स्मार्ट व्हिलेजमध्ये स्थान असेल. त्याचबरोबर अपंगांसाठी ‘निजबल’, बेरोजगार तरुणांसाठी ‘युवाग्राम’ या प्रकल्पाबरोबरच ‘मियावाकी’ पद्धतीने चार जंगले वसवत पर्यावरण रक्षणाचाही विडा त्यांनी उचलला होता.

आजोबा बाबा आमटे, आईवडील विकास-भारती आमटे यांच्यासह संपूर्ण आमटे कुटुंबियांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्याच्या दृष्टीने डॉ. शीतल यांनी २००३ मध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण घेतलं. सामाजिक उद्यमता (सोशल आंत्रप्रनरशिप) हा अभ्यासक्रम पूर्ण केला. हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचं वित्त नियोजन त्या करत होत्या. वयाच्या चाळिशीच्या आत केलेल्या कामाबद्दल ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने मार्च २०१६ मध्ये ‘यंग ग्लोबल लीडर’ म्हणून त्यांची निवड केली होती. पुढे अमेरिकेत जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून लीडरशिपचा कोर्सही शीतल यांनी पूर्ण केला होता. मेडिकल लीडरशिप क्षेत्रात ‘लॅन्सेट कमिशन ऑन ग्लोबल सर्जरी’ सोबत ‘मशाल’ आणि ‘चिराग’ असे दोन कार्यक्रम सुरू केले.

शीतल यांचे आरोप आमटे कुटुंबियांनीच फेटाळले होते
दरम्यान, शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक चित्रफीत जारी केली होती. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. ही चित्रफीत नंतर दोन तासांतच माध्यमातून हटवण्यात आली होती. त्यात करण्यात आलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले होते. डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल (पूर्वाश्रमीच्या डॉ. शीतल विकास आमटे) या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती. शीतल यांनी समाजमाध्यमावर जारी केलेल्या चित्रफितीतसुद्धा तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं होतं.

शीतल आमटे यांनी संस्थेच्या कार्यात मोठे योगदान दिले असले तरी त्यांनी विश्वस्त तसेच कार्यकर्त्यांबद्दल जी अनुचित वक्तव्ये केली, ती आधारहीन आहेत. त्यांचे सर्व भाष्य तथ्यहीन आहे. त्यांच्या या आरोपामुळे कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे निवेदन देण्यात येत असल्याचं या चौघांनी म्हटलं होतं. लोकाश्रयावर विकसित झालेल्या या संस्थेचे काम यापुढेही आमटे कुटुंबातर्फे एकदिलाने चालवले जाईल. तसेच संस्थेने घेतलेल्या नैतिक भूमिकांशी व ध्येयाशी आम्ही प्रामाणिक राहू, असा विश्वास यातून व्यक्त करण्यात आला होता. समाजाने कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, अशी विनंती यातून करण्यात आली होती. या निवेदनामुळे आमटे कुटुंबातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -