घरताज्या घडामोडीअजित पवारांना तेव्हा २८ आमदारांचा होता पाठिंबा

अजित पवारांना तेव्हा २८ आमदारांचा होता पाठिंबा

Subscribe

भाजप-राष्ट्रवादी मिळून होणार होते सरकार स्थापन, ‘ट्रेडिंग पावर’ पुस्तकात खळबळजनक दावा

माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत २३ नोव्हेंबर २०१९ रोजी भल्या पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे २८ आमदार होते, असा खळबळजनक दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे.

भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता. मात्र, शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तो बदलला, असा दावा लेखिका प्रियम गांधी यांनी आपल्या ‘ट्रेडिंग पावर’ या पुस्तकात केला आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. केवळ 78 तास टिकलेल्या या सरकारच्या स्थापनेमागील इनसाईड स्टोरी लेखिका प्रियम गांधी यांनी त्यांंच्या पुस्तकातून समोर आणली आहे. या पुस्तकात देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांना दूरध्वनीवरून केलेले प्रश्न आणि अजित पवार यांनी त्यावर दिलेली उत्तरे प्रियम गांधी यांनी आपल्या पुस्तकात जशीच्या तशी छापली आहेत. या शपथविधीची स्क्रीप्ट तयार कशी झाली हे ‘ट्रेडिंग पावर’ या गांधींच्या पुस्तकात नमूद केले आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादीचे दोन ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांनी शरद पवार यांना भाजपाला समर्थन द्यायचे असल्याचे संकेत त्यांनी दिले. देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित याबाबत अमित शहा यांना माहिती दिली. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांची बैठक झाली. त्या बैठकीत शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे उपस्थित होते, असा दावा प्रियम गांधी यांनी केला.

- Advertisement -

अमित शहांशी शरद पवारांची चर्चा
शरद पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या बैठकीत शरद पवार यांनी भाजपला समर्थन देण्याची इच्छा असल्याचे अमित शहा यांना सांगितले. कोणते खाते कोणाला देण्यात येईल याबाबतही त्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रपती शासन आणण्यास ते मदत करतील, असेही त्या बैठकीत ठरवण्यात आले. त्यानंतर राज्यातील परिस्थिती सांभाळून घेतली जाईल आणि माध्यमांसमोर येऊन लोकांची स्थिती पाहून महाराष्ट्रात एक स्थिर सरकार स्थापन होण्याची आवश्यकता आहे. तसेच स्थिर सरकार देण्यासाठी मी आणि माझा पक्ष भाजपाला समर्थन देण्यास तयार आहोत हेदेखील ठरले, असे त्या म्हणाल्या. त्यावेळी शरद पवार यांनी केवळ अमित शहा यांच्याशी भेट झाली आणि त्यानंतर 20 तारखेला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतल्याचे प्रियम गांधी म्हणाल्या.

शिवसेना-काँग्रेसचाही सरकार स्थापनेचा प्रयत्न
यावेळी शिवसेना आणि काँग्रेसही राष्ट्रवादीसह सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते. शरद पवार यांना कोणीही समजू शकत नाही. ज्यावेळी सरकार स्थापन करण्याची वेळ आली त्यावेळी काँग्रेस आणि शिवसेना अनेक गोष्टींचा त्याग करण्यास तयार होते. त्यामुळे सत्तेचे केंद्र राष्ट्रवादीकडे आले असते म्हणून कदाचित त्यांचे मन बदलले, असा दावाही त्यांनी केला. ज्यावेळी शरद पवार यांनी आपले मन बदलले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्या निर्णयाचे समर्थन केले नाही. परंतु तोंडी झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी तीन पक्षांचे सरकार चालणार नाही असे वाटत असल्याचे सांगत विरोध केला होता. भाजपालाही आपण समर्थन दिले पाहिजे असेही ते म्हणाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना आपला जुना प्लॅनच पुढे नेण्यासाठी अजित पवार तयार असल्याचेही त्यांनी सांगितले, असा दावा प्रियम गांधी यांनी केला.

नक्की काय घडलं हॉटेलमध्ये?
अजित पवार आणि फडणवीस यांच्यात एका हॉटेलमध्ये चर्चा झाली. त्यावेळी फडणवीस यांनी त्यांना हे खरे आहे का असा सवालही केला. त्यानंतर त्यांनी हे खरे असल्याचे उत्तर दिले. त्यावेळी अजित पवारांनी 28 आमदारांचे समर्थन असून अजून काही आमदारही आपल्याला समर्थन देतील, असेही त्यांनी सांगितले. त्यांना इतर आमदारांसोबतच ठेवून इतर आमदारांनाही आपल्याकडे आणण्यास त्यांना सांगू असे त्यावेळी ठरवण्यात आले.

राष्ट्रपती राजवट हटवण्याचे प्रयत्न
दोन्ही पक्षांमध्ये चर्चा घडवून आणणार्‍या व्यक्तीचं मी नाव घेणार नाही. परंतु गेल्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्रीही होते आणि ते सध्याही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, असे प्रियम गांधी यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. नेहरू सेंटरला 22 तारखेला एक बैठक झाली. त्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर अजित पवार हे वर्षा बंगल्यावर पोहोचले आणि त्यांना आता आपण थांबवू शकणार नाही, असे वाटत असल्याचे म्हटले. फडणवीस यांनी त्यानंतर अमित शहा यांच्याशी चर्चा केली. तसंच आपल्याला दावा करायचा असल्यास आपल्याला त्वरित दावा करावा लागेल, असे शहा म्हणाले. तुम्ही त्वरित राज्यपालांकडे समर्थनाचं पत्र घेऊन दावा करण्यास जा, असेही ते म्हणाले. त्यानंतर मी केंद्रातून राष्ट्रपती शासन कसे हटवता येईल हे पाहीन असेही ते म्हणाले. राष्ट्रपती शासन हटवण्यासाठी आवश्यक असलेल्या मंत्रिमंडळाची बैठक घेण्यासाठी त्यावेळी वेळ नव्हता. त्यानंतर केंद्रातून त्यांचे प्रयत्न सुरू असतानाच त्याचवेळी या ठिकाणीही राज्यपालांच्या निवासस्थानी तयारी सुरू झाली. अजित पवारांकडे आमदारांच्या सह्यादेखील होत्या. त्यावेळी त्यांनी राज्यपालांनी दावा स्वीकारला आणि राष्ट्रपती शासन हटवले, असेही त्यांनी नमूद केले.

पवार कुटुंबातील वादही पुस्तकात
महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे घराणे असलेल्या पवार कुटुंबातील वादावर पहिल्यांदाच एका पुस्तकातून ओझरता प्रकाश टाकण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबात पक्षावरील नियंत्रणावरून वाद नसला तरी सारं काही आलबेल नसल्याचेही या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. पक्षावरील नियंत्रणावरून आमदार रोहित पवारांना बळ दिले जात असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना डावलले जात असल्याचा धक्कादायक खुलासा या पुस्तकात करण्यात आला आहे. एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हवाल्यावरून या पुस्तकात ही माहिती दिली असली तरी या पुस्तकात माहिती देणार्‍या त्या राष्ट्रवादीच्या नेत्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -