पशुधनात होणारी घट आणि झटपट मिळणारा एलपीजी सिलिंडर आदी कारणामुळे प्रदूषण विरहित समजला जाणारा गोबर गॅस तालुक्यातून कालबाह्य ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. मुरुड तालुक्यातील डोंगरी, सर्वे, चिकणी, बारशीव, काशीद या गावांतून घराघरात गोबर गॅस असायचे. कमी खर्चात संपूर्ण कुटुंबाची गरज पूर्ण करणारा हा गॅस कुटुंबासाठी योगदान ठरत असे. स्वयंपाकासाठी धूर किंबहुना प्रदूषण विरहित गोबर गॅस चुलीमुळे दिलासा तर मिळत होता, शिवाय झटपट स्वयंपाकही करता येत होता. शिवाय गोबर गॅस सयंत्रातून निघणार्या शेणकुटापासून नैसर्गिक सेंद्रिय शेणखत मिळत असे. मात्र आता दिवसेंदिवस शेतीच्या आधुनिकीकरणात शेतकर्यांकडील पशुधन कमी झाल्याने ग्रामीण भागातील गोबर गॅस कालबाह्य किंवा हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे.
बदलत्या काळात गोबर गॅसची जागा आता एलपीजी गॅस सिलिंडरने घेतली आहे. वाढत्या महागाईत हे सिलिंडर शेतकर्यांना परवडणारे नसले तरी तो खरेदी करणे भाग पडत असून, दुसरीकडे गुरांची संख्या कमी झाल्याने गॅसकरिता लागणारे शेण आणि गोमुत्रही कमी प्रमाणात मिळत आहे. ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी एकेकाळी महत्त्वाचा घटक असणारा गोबर गॅस आता हळूहळू लुप्त होत चालला आहे. आधुनिक शेतीची कास धरताना नांगराऐवजी ट्रॅक्टर आल्याने पशुधन आपोआप कमी होत गेले आहे. त्यामुळे गोबर गॅस प्रक्रिया सुरू ठेवणे अवघड होऊन गेले आहे.
डोंगरी येथील अभिजीत जाधव यांना या संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले की, गोबर गॅसमुळे आर्थिक बळ मिळत होते. परंतु आता जागेअभावी जास्त प्रमाणात बैल, गाय पाळणे कठीण झाले आहे. दिवसभरात गाई, बैल चरण्याकरिता बाहेर असतात. त्यामुळे लागणारे शेण, गोमुत्र कमी प्रमाणात मिळत असल्याने गोबर गॅस बंद करण्यात आले. गोबर गॅसचा जास्त प्रज्वलीत करण्यासाठी गोमुत्रचे प्रमाण जास्त लागते. तेच पुरेशा प्रमाणात मिळणे कठीण झाल्याचेही जाधव यांनी सांगितले.
हे ही वाचा – फडणवीसांना भेटल्यानंतर अधिकारी मंत्र्यांवर आरोप करतात, नवाब मलिकांच्या आरोपाने खळबळ