महाविकास आघाडीमध्ये आपसांत मतभेद असल्याच्या चर्चा वारंवार सुरुच आहेत. यामध्ये आता सत्ताधारी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेकडे असलेल्या महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या निविदेवर आक्षेप घेतला आहे. नाना पटोले यांनी आक्षेप घेणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. हे पत्र ऊर्जा विभागाच्या विरोधात असल्याची बातमी दाखवली जात आहे परंतु ही बातमी चूकीची असून ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा डाव असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. खनिकर्म महामंडळाच्या निविदेमध्ये चूका आढळल्याने पत्र लिहिले असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून खनिकर्म महामंडळ रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात येणारे कंत्राट स्थगित करावे अशी मागणी केली आहे. खनिकर्म महामंडळ अध्यक्षपदी शिवसेना आमदार आशिष जयस्वाल आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं शिवसेनेच्या आखत्यारित असलेल्या महामंडळाच्या विरोधात पत्र लिहिल्यामुळे ठाकरे सरकारमधील वाद उफाळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मी ऊर्जा विभागाच्या विरोधात पत्र लिहिल्याची @abpmajhatv ने दाखवलेली बातमी पूर्णपणे असत्य व चुकीची आहे. माझे पत्र हे खनिकर्म महामंडळातील टेंडरबाबत आहे या महामंडळाचा ऊर्जा विभागाशी काही संबंध नाही: प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले pic.twitter.com/dzBPphgaAx
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) July 1, 2021
नाना पटोले काय म्हणाले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, आज जी बातमी दाखवण्यात येत आहे ती चुकूची आहे. कुठल्याही पत्र ऊर्जाविभागाच्या विरोधात लिहिले नाही. खनिकर्म विकास महामंडळ जे नागपूरचे आहे. या खनिकर्म महामंडळाच्या कंत्राटबाबत जी निविदा काढण्यात आली होती यामध्ये खुप सारे चुकीचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्याविषयावर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. या पत्रात ऊर्जाविभागाचा काही संबंध नाही. काँग्रेसमध्ये भांडणं आहेत असा दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि माझ्यामध्ये वाद आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.