घरताज्या घडामोडीघुसखोरी करणारा एकही दहशतवादी जिवंत परतणार नाही -लष्कर प्रमुख

घुसखोरी करणारा एकही दहशतवादी जिवंत परतणार नाही -लष्कर प्रमुख

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या नागरोटा येथे गुरुवारी पहाटे झालेल्या दहशतवादी आणि भारतीय जवानांच्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर भारतीय लष्कराचे प्रमुख एम. एम. नरवणे यांनी भारतात घुसखोरी करणार्‍या अतिरेक्यांना सज्जड दम भरला आहे. सीमेवरून भारतात होणारा घुसखोरीचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न केल्यास एकही दहशतवादी जिवंत परतणार नाही, असा निर्वाणीचा इशाराच नरवणे यांनी दिला आहे.

नियंत्रण रेषेवरून होणारी घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही. या घुसखोरी करणार्‍या अतिरेक्यांना तिथल्या तिथेच ठार मारले जाईल. हे दहशतवादी परत पाकिस्तानात जाऊ शकणार नाहीत. हा संदेश पाकिस्तान आणि त्यांच्या अतिरेक्यांसाठी पुरेसा आहे, असं नरवणे यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं.

- Advertisement -

यावेळी लष्करप्रमुख नरवणे यांनी तांदळाच्या पोत्यांनी भरलेल्या ट्रकमधून जाणार्‍या अतिरेक्यांविरोधात भारतीय जवानांनी यशस्वी ऑपरेशन केल्याबद्दल जवानांचे कौतुक केले. भारतीय सेना, जम्मू-काश्मीर पोलीस आणि अर्ध सैनिक दालातील उत्तम समन्वयामुळेच हे ऑपरेशन यशस्वी होऊ शकल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षा दलाने केलेले हे अत्यंत यशस्वी ऑपरेशन होते. सुरक्षा दलाच्या उत्तम समन्वय आणि सुसंगततेचे हे उत्तम उदाहरण होते. त्यामुळे आमच्या देशात जो कोणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल त्याला अशा पद्धतीनेच परिणामाला सामोरे जावे लागेल, असा संदेशच या ऑपरेशनमधून गेला असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात गुरुवारी पहाटे अतिरेकी आणि भारतीय जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीत एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बान टोलनाक्यावर गुरुवारी पहाटे पाच वाजता दहशतवादी आणि भारतीय जवान आमनेसामने आले. यानंतर दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरु झाला. या पार्श्वभूमीवर नागरोटा परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून जम्मू-श्रीनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -