नागपूर – नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग सुरुवातीपासून अपघातांच्या मालिकेने कुप्रसिद्ध झाला. अवघ्या 14 महिन्यात महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गावर मोठा खड्डा पडला आहे. अनेकांचा बळी घेणाऱ्या ‘मृत्यूचा रस्ता’ अशी ओळख झालेल्या समृद्धी महामार्गावर आता खड्डा पडल्यामुळे या कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागपूर ते मुंबई या 800 किलोमीटर मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले होते. मात्र उद्घाटनापासून या मार्गावर अपघात होत असल्यामुळे मृत्यूचा सापळा म्हणून या रस्त्याला प्रवाशी संबोधत आहेत. त्यातच अमरावती जवळ नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव जवळ समृद्धी महामार्गावर मोठा खड्डा पडला आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण कोसळले आहे. यावेळी या मार्गाखालून काही शेतकरी जात होते, मात्र ते या अपघातातून बचावले.
समृद्धी महामार्गाच्या बांधकामाबद्दल अनेक तक्रारी दाखल आहेत. गेल्या सहा महिन्यांत या रस्त्याच्या बांधकामात त्रुटी असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यावर प्रशासनाने काय उपाययोजना केल्या याचीही कल्पना नागरिकांना नाही, हे विशेष. त्यातच रस्त्यावर खड्डा पडल्यामुळे या मार्गाच्या बांधकामावर पुन्हा शंका उपस्थित होत आहे.
फेब्रुवारी महिन्यातील अपघात
समृद्धी महामार्गावर फेब्रुवारी महिन्यात भीषण अपघात झाले. नऊ फेब्रुवारी रोजी दौलताबादजवळ नादुरुस्त कंटेनरला कार धडकल्यानं झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले. रात्री अकाराच्या सुमारास झालेल्या या अपघातात राहुल आनंद निकम ( वय 47 वर्षे) शिवानी वामनराव थोरात ( वय 58 वर्षे) आणि अण्णा रामराव मालोदे (71 वर्षे) या तिघांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरील भाग अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्याच तारखेला वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी बस थेट महामार्गावर उलटली होती. यात 15 प्रवाशी गंभीर जखमी झाले होते. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
समृद्धी महामार्गावर 25 जानेवारीच्या पहाटे एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. चालकाला झोप लागल्यामुळे बाजूच्या कंटेनरला धडक बसून हा अपघात झाला होता. त्यानंतर 26 जानेवारीच्या रात्री पुण्यावरून अमरावतीकडे जाणाऱ्या एका कारने चालत्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली होती. या धडकेत एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना वाशिमच्या मालेगाव-वनोजा दरम्यान लोकेशन चॅनल क्रमांक 234 कॉरिडॉर येथे घडली.
हेही वाचा : EOW : अजित पवारांना दिलासा! शिखर बँक घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लोजर रिपोर्ट सादर
25 जणांचा होरपळून मृत्यू
समृद्धी महामार्गावर गेल्या वर्षी जुलैमध्ये मोठा अपघात झाला होता. जुलै 2023 मध्ये समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ खासगी बसने पेट घेतला होता. यात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.