आतापर्यंत गोव्याबद्दल वाचत, समजत आलो आहे. गोव्याचा विकास जर करायचा असेल, गोवेकरांचा विकास करावा लागेल. राजकारण्यांचा विकास झाला पण गोवेकरांचा विकास झाला नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आपण नम्रतेने रहायचे आहेत. शिवसैनिक हे सामान्यांमधील माणसे आहेत. त्यामुळे आतापर्यंत जे राजकारणी डोळे बंद चालले आहेत, त्यांचे डोळे उघडायचे आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार आपल्याला गोव्यातही ८० टक्के राजकारण, २० टक्के समाजकारण करायचे आहे. गोव्यात अजुनही लोडशेडींग, पाणी, प्रवासाच्या मूलभूत सुविधांना वंचित रहावे लागले आहे. त्यामुळेच मुंबई, महाराष्ट्रासारखाच गोव्याचाही विकास करणार असल्याची ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील सभेत ते बोलत होते. मुंबईतील प्रवासाच्या बेस्टच्या प्रवासाच्या पॅटर्नचे आश्वासनही त्यांनी गोवेकरांना दिले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गोव्याचा दौरा केला. येथे लोकांकडून मिळालेले प्रेम भारावून टाकणारे होते. महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यात सुद्धा शिवसेना येथील भूमीपुत्रांसह खंबीरपणे उभी आहे. pic.twitter.com/BiPKXRvnKL
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 11, 2022
आदित्य ठाकरे यांनी दिवसातील किती तास वीज पुरवठा खंडित होतो ? असा सवाल गोवावासीयांना केला. त्यानंतर राज्य परिवहन मंडळाची बस येते का ? असाही सवाल केला. डिझेल पाठोपाठ इलेक्ट्रिक व्हेईकलचेही दर वाढवल्याच्या मुद्द्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले. मुंबईत बेस्ट बसच्या माध्यमातून नागरिकांना २० रूपयात शहरात कुठेही फिरण्याची सुविधा आहे. अशीच सुविधा ही गोव्यातही देऊ असेही आश्वासन आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.
शाश्वत विकास करत असताना महाराष्ट्रात आम्ही एकाही झाडाला त्रास दिला नाही. झाडाच्या शेजारून आम्ही फ्लायओव्हर अनेक ठिकाणी नेले. तसाच शाश्वत विकास गोव्यातही करायचा आहे. गोव्यातही पर्यावरणाचे आणि पर्यटकांच्या सुविधांच्या अनुषंगाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना, युवासेनेचे कार्यकर्ते सध्या गोव्यात सक्रीय झाले असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.