काश्मीर संदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. काश्मीरला दिला जाणारा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला जाणार आहे. याशिवाय कलम ३७०, कलम ३५ ‘अ’ रद्द करण्यात येणार आहे. सोमवारी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत यासंदर्भात घोषणा केली. मात्र, विरोधकांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका केली. विरोधकांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना अमित शहांनी ३७० कायद्यामुळे काश्मीरचे किती नुकसान झाले? यासंदर्भातच विश्लेषण केले. ३७० कायदा रद्द झाला तर काश्मीरची संस्कृती, भाषा टिकणार नाही, अशी अफवा असल्याचे अमित शहा म्हणाले. यासोबतच भारतातील महाराष्ट्र राज्यालाही ३७० कायदा नाही, मग मंहाराष्ट्राची संस्कृती टिकली नाही का? किंवा गुजरातची संस्कृती टिकली नाही का? असा प्रश्न अमित शहांनी राज्यसभेत उपस्थित केला.
‘कलम ३७० कायद्यामुळे काश्मीरचे मोठे नुकसान झाले’
कलम ३७० मुळे काश्मीरचे मोठे नुकसान झाल्याचे अमित शहा म्हणाले. या कलमुळे काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. काश्मीरच्या तरुणांचे मोठे नुकसान झाले. कलम ३७० मुळे काश्मीरच्या तरुणांना रोजगार मिळाला नाही. यासोबतच या कलमामुळे काश्मीरमधील पर्यटनाचे मोठे नुकसान झाले. काश्मीरच्या घाटी परिसराचा विकास झाला नाही, असे अमित शहा म्हणाले. मात्र, आता काश्मीरचा योग्यपणे विकास करता येणार आहे, असे अमित शहा म्हणाले.
हेही वाचा – ‘आज जम्मू काश्मीर घेतलं उद्या पाकव्याप्त काश्मीर घेऊ’