योगगुरू बाबा रामदेव यांनी मंगळवारी पतंजली समूहाची २५ हजार कोटींच्या उलाढालीसह पंतजलीची विस्तार योजना २०२५ स्पष्ट केली. यावेळी बाबा रामदेव यांनी असे सांगितले की, योग आणि आयुर्वेदात भारत सरकार जे करू शकत नाही असे संशोधन पतंजलीने केले. पतंजली ब्रँड नाही तर एक चळवळ आहे, आम्ही पाच वर्षात पाच लाख लोकांना रोजगार दिला आहे, येत्या पाच वर्षात पाच लाख लोकांना रोजगार देऊ, असे आश्वासन देखील त्यांनी दिले. तसेत पतंजलीने परदेशी कंपन्यांना मागे टाकले, १०० हून अधिक औषधे तयार केली, असा बाबा रामदेव यांनी दावा देखील केला.
रामदेव यांनी पुढे असे सांगितले, “आज आपण औषधांची एक नवीन साखळी आणत आहोत, भारतात आज ८० ते ९० टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. त्याच वेळी, ५० ते ६० टक्के लोकांमध्ये प्रथिनेची कमतरता भासते. त्याचप्रमाणे लोकांमध्ये वेगवेगळ्या जीवनसत्त्वांची कमतरता असते. आम्ही आयुर्वेदिक मार्गाने हे सर्व उपलब्ध करून दिले आहे. तसेच ते म्हणाले, “पारंपारिक, सांस्कृतिक औषधे राखण्याबरोबरच १०० पेक्षा जास्त संशोधन आणि पुरावा आधारित औषधे तयार केल्याचा मला अभिमान आहे. या कामात आमच्याकडे साधारण पाचशे वैज्ञानिकांची टीम आहे.
दरम्यान, पतंजलीच्या भविष्यातील भूमिकेविषयी माहिती देताना बाबा रामदेव म्हणाले की, “आमचे लक्ष संशोधन, आरोग्य आणि शिक्षणावर आहे. यासह कृषीकडेही अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे. आम्हाला अभिमान आहे की, आम्ही दोन लोकांकडून योगासना शिकवण्यास सुरुवात केली आहे आणि जगातील दोनशे देशांतील १०० ते २०० कोटी लोकांनी दररोज किंवा कधीकधी का असेणा योगा करणे सुरू केले आहे.
योगगुरू बाब रामदेव यांनी मंगळवारी दावा केला की पतंजली योगपीठाने भारताला स्वावलंबी भारत होण्यासाठी प्रेरणा दिली आणि देशाच्या आर्थिक समृद्धीसाठी मोठे योगदान दिले. बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पतंजली योगपीठाने हिंदुस्तान युनिलिव्हर वगळता सर्व कंपन्या मागे ठेवल्या आहेत. यासह, त्यांनी दावा केला की सन २०२५ पर्यंत आम्ही हिंदुस्तान युनिलिव्हरलाही मागे टाकू.