पणजी : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यापेक्षा आपली वेळ जास्त मौल्यवान असल्याचा अजब दावा योगगुरू बाबा रामदेव यांनी केला आहे. कॉर्पोरेट्स आपला 99 टक्के वेळ स्वार्थासाठी घालवतात, तर सर्वांच्या भल्यासाठी साधू आपला वेळ खर्ची करतो, असेही बाबा रामदेव म्हणाले. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते.
पणजीमध्ये रविवारी आयोजित एका कार्यक्रमात बाबा रामदेव यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बाबा रामदेव बोलत होते. मी हरिद्वारहून तीन दिवसांसाठी येथे आलो आहे. माझ्या वेळेची किंमत अदानी, अंबानी, टाटा आणि बिर्ला यांच्यासारख्या अब्जाधीश उद्योगपतींपेक्षा जास्त आहे. माझे येथील तीन दिवसांचे वास्तव्य अधिक उपयुक्त आणि मौल्यवान होते. कॉर्पोरेट्स आपला 99 टक्के वेळ स्वार्थासाठी घालवतात, तर साधूचा वेळ सर्वसामान्यांच्या हितासाठी असतो, असा दावा त्यांनी केला.
Chief Minister, @DrPramodPSawant attended the Lokmanya Matrubhumi Puraskar 2023 at Azad Maidan, Panaji, Goa. 1/2 pic.twitter.com/KPjARGfP0F
— DIP Goa (@dip_goa) February 19, 2023
या आर्थिक वर्षात पतंजलीला 40,000 कोटी रुपयांची उलाढाल करणारी कंपनी बनवल्याबद्दल त्यांनी बालकृष्णचे कौतुक केले. भारताला ‘अत्यंत गौरवशाली’ बनवायचे असेल तर पतंजलीसारखी साम्राज्ये निर्माण करावी लागतील, असे ते म्हणाले.
कोरोनानंतर कॅन्सरचे रुग्ण वाढले?
कोरोना महामारीनंतर देशात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय, लोकांमध्य दृष्टीदोष तसेच कर्णबधिरता वाढली असल्याचा दावाही बाबा रामदेव यांनी केला आहे.
तथापि, प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या गोवा युनिटचे माजी प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी योगगुरू बाबा रामदेव यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. जगभरातील लोकसंख्येच्या वाढीसह कर्करोगाच्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. वर्षाला साधारणपणे पाच टक्के वाढ झाली आहे, असे सांगून डॉ. शेखर साळकर म्हणाले की, कर्करोगाचे रुग्ण कमी होत नाहीत. परंतु यासाठी कोविड-19 महामारीचे कारण देता येणार नाही. योगगुरू बाबा रामदेव यांचे नाव न घेता ते म्हणाले, सेलिब्रेटींनी जबाबदार विधाने केली पाहिजेत; कारण लोक त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवतात.