पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुका ८ टप्प्यात होत असून आगामी पाचवा टप्पा १७ एप्रिल रोजी पार पडणार आहे. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली दिसतेय. आपलाच पक्ष कसा विजयी ठरेल यासाठी सर्वच राजकीय पक्ष ताकदीने प्रचार सभा घेताना दिसताय. या प्रचारादरम्यान केवळ नेते मंडळी आपल्या पक्षाचे धोरण जनतेपर्यंत पोहोचवत नाही तर विरोधकांवर देखील कुरघोड्या करताना दिसताय. मतदानाच्या चौथ्या टप्प्यानंतर राज्यात प्रचारामोहीमेला वेग आला असून भाजप आणि टीएमसी नेते एकमेकांकडून राजीनामा देण्याची मागणी करत आहेत.
दरम्यान, विधानसभा मतदानाच्या पाचव्या टप्प्यात होणाऱ्या मतदानापूर्वी भाजप नेते अमित शाह यांनी रविवारी बशीरहाटमध्ये अनेक प्रचारसभा आणि रोड शो देखील केले. अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर पलटवार करत चांगलाच निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी बॅनर्जींच्या राजनाम्याची मागणी केली. ‘जेव्हा जनता सांगेल तेव्हा मी माझा राजीनामा देईल. मात्र ममता दीदी तुम्हाला तुमचा राजीनामा २ मे रोजी द्यावाच लागेल.’ गेल्या दोन दिवसांपूर्वी अर्धसैनिक दलाच्या वतीने कूचबिहारमध्ये झालेल्या गोळीबाराबद्दल ममता बॅनर्जी यांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याच वक्तव्यावर शहांनी हे वक्तव्य केले आहे.
यासोबत अमित शहा असेही म्हणाले की, निवडणूकीदरम्यान, ममता बॅनर्जी हिंसाचाराला प्रवृत्त करत आहेत. गैरवर्तन करणाऱ्यांवर आरोप करत अमित शहा म्हणाले, मतदानाच्या वेळी जवानांकडून शस्त्रे हिसकावण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. निवडणुकीदरम्यानस अनेक हल्ले सुरू असताना काही अफवा पसरल्यानंतर कूचबिहारमध्ये हिंसाचार सुरू झाला. या हिंसाचारात ४ लोकांचा जीव देखील गेला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी अमित शहा यांच्यावरील हिंसाचाराला जबाबदार धरले होते. यामुळे अमित शाह आणी ममता बॅनर्जी यांच्या शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.