दिल्लीच्या निकालामुळे अंहकारी आणि धर्मांध राजकारणाला लोक थारा देत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मागच्या काही काळापासून राजस्थान, पंजाब, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्ली राज्याचे निकाल पाहीले तर एक गोष्ट लक्षात येते की, भाजपच्या विरोधात लोकांना पर्याय हवा आहे. मला वाटतं देशातील मतदारांना विरोधी पक्षांकडून एका व्यापक आणि किमान समान कार्यक्रमाची अपेक्षा आहे. भाजप ही देशातील राष्ट्रीय आपत्ती आहे, असे समजून आता काम करावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने हकहाती विजय मिळवल्याबद्दल शरद पवार यांनी आपला शुभेच्छा दिल्या. आपच्या विजयाचे गमक सांगताना शरद पवार म्हणाले की, दिल्लीत करोल बाग नावाचा परिसर आहे. जिथे मराठी लोकांची संख्या जास्त आहे. मी निवडणुकीआधी तिथल्या लोकांशी बोललो होतो. त्यावेळी त्यांनी आपवर विश्वास दर्शविला होता. आप पक्षाने दिल्लीतील दैनंदिन प्रश्न सोडविले असल्यामुळे दिल्लीकरांनी पुन्हा एकदा आपला सत्ता दिली आहे.
शरद पवार पुढे म्हणाले की, दिल्लीचे महत्त्व वेगळे आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातले लोक दिल्लीत राहतात. त्यामुळे हा निर्णय फक्त दिल्लीचा नाही. तर भारतातील प्रत्येक प्रातांचा तो निर्णय आहे.