ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधील ( एम्स ) वरिष्ठ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ यांनी कोरोनाविरोधात लहान मुलांना लस देण्याचा केंद्राचा निर्णय “अवैज्ञानिक” असल्याचे म्हटले आहे. तसेच या निर्णयामुळे नागरिकांचा कोणताही अतिरिक्त फायदा होणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.
संस्थेतील प्रौढ आणि मुलांसाठीच्या कोवॅक्सिन चाचण्यांचे प्रमुख संशोधक आणि भारतीय सार्वजनिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ संजय के. राय म्हणाले की, लहान मुलांच्या लसीकरणाचा निर्णय लागू करण्यापूर्वी ज्या देशांनी मुलांचे लसीकरण सुरू केले आहे, त्या देशांच्या डेटाचे विश्लेषण करणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचे वाढते संकट पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी १५ ते १८ वयोगटातील लहान मुलांचे पुढील वर्षी ३ जानेवारीपासून लसीकरण केले जाईल अशी घोषणा केली. या निर्णयामुळे देशाची कोरोना विषाणू विरुद्धची लढाई केवळ बळकटच होणार नाही, तर शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांची आणि त्यांच्या पालकांची चिंताही कमी होईल. अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. मात्र पंतप्रधान मोदींच्या या निर्यणयावर व डॉ. राय निराशा व्यक्त केली आहे.
डॉ. राय निराश यांनी पंतप्रधान कार्यालयाला टॅग करत ट्विट केले की, “देशाची निस्वार्थ सेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचा खूप मोठा चाहता आहे, परंतु मुलांच्या लसीकरणाच्या अवैज्ञानिक निर्णयामुळे मी पूर्णपणे निराश झालोय. डॉ. राय यांनी आपला दृष्टिकोन स्पष्ट करत सांगितले की, कोणत्याही हस्तक्षेपाचे स्पष्ट उद्दिष्ट असले पाहिजे. यामागचा एकमेव उद्देश एकतर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणे किंवा गंभीरता किंवा मृत्यू टाळणे हा आहे.
‘कोरोना संसर्ग रोखण्यात लसीकरण अयशस्वी ठरले आहे, पण…’
डॉ. राय पुढे म्हणाले की, “सध्या आपल्याकडे लसींबद्दल उपलब्ध माहितीनुसार, लसीकरण संसर्ग लक्षणीयरित्या कमी करू शकत नाहीत. काही देशांमध्ये बूस्टर डोस मिळाल्यानंतरही लोकांना संसर्ग होत आहे. याव्यतिरिक्त, यूकेमध्ये दररोज ५०,००० संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. अशा परिस्थितीत लसीकरणामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखता येत नसून रोगाची तीव्रता आणि मृत्यू रोखण्यासाठी ही लस प्रभावी ठरत असल्याचे सिद्ध होत आहे. यामुळे अतिसंवेदनशील लोकसंख्येमध्ये मृत्यूचे प्रमाण सुमारे १.५ टक्के आहे.
लसीकरणामुळे ८० ते ९० टक्के मृत्यू रोखू शकतो, म्हणजेच प्रति १० लाख लोकसंख्येमागे १३ हजार ते १४ हजार मृत्यू टाळता येऊ शकतात. लसीकरणानंतर गंभीर प्रकरणे प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे फक्त १० ते १५ च्या दरम्यान आहेत. त्यामुळे प्रौढांच्या लसीकरणामुळे जोखीम कमी होत आहे. कोरोनामुळे झालेल्या बालमृत्यूच्या बाबतीत ते म्हणाले की, संसर्गाची तीव्रता खूपच कमी आहे. सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध आकडेवारीनुसार, प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे फक्त दोन मृत्यूची नोंद झाली आहे. मुलांच्या मृत्यूचे प्रमाण प्रौढांच्या तुलनेत खूपच कमी आहे.