उत्तराखंडच्या चारधाम यात्रेसाठी दररोज हजारो भाविक दाखल होत आहेत. दर्शनासाठी मंदिर परिसरात तीन किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहे. या यात्रेदरम्यान भाविकांच्या मृत्यूच्या घटना सातत्याने घडत आहेत. सोमवारी रात्री अचानक मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्याने यात्रा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र मंगळवारी पुन्हा सकाळी सहा वाजता बद्रीनाथ यात्रा सुरु झाली. तर दुसरीकडे चार धाम यात्रेत आत्तापर्यंत 41 भाविकांचा मृत्यू झाला आहे. यात केदारनाथ यात्रेदरम्यान सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यादरम्यान 15 प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. त्याचवेळी यमुनोत्रीमध्ये 14, बद्रीनाथमध्ये 8 आणि गंगोत्रीमध्ये चार यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे.
उच्च रक्तदाब, ह्रदयाशी संबंधित आजार, डोंगर चढताना आला तणाव यामुळे भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत आरोग्याच्या समस्या असणाऱ्या प्रवाशांना प्रवास न करण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येत आहे. यामुळे चार धाम यात्रेतील मृतांची संख्या आतापर्यंत 40 वर पोहोचली आहे.
कोरोनानंतर दोन वर्षांनी चार धाम यात्रा सुरु झाल्याने दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. अशा स्थितीत केदारनाथ आणि बद्रीनाथमध्ये अनेक किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या आहेत. मात्र ही चारधाम यात्रा शिखरावर असल्याने प्रवासादरम्यान यात्रेकरूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेक प्रवाशांना बाजारात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जलकुंभाने केलेल्या सार्वजनिक टाक्या कोरड्या पडल्या आहेत. कडक उन्हाच्या या काळात टाकी पूर्णपणे कोरडी पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असतानाही भाविकांची रिघ वाढत आहे.
बद्रीनाथचे दरवाजे उघडल्यानंतर 8 मे ते 16 मे सायंकाळपर्यंत 17,64,63 यात्रेकरूंनी दर्शन घेतले. त्याचवेळी केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्यापासून आत्तापर्यंत 21,36,40 यात्रेकरूंनी दर्शन घेतले आहे. यात्रेकरूंची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाकडूनही कडक पाऊले उचलली जात आहे. आता दररोज 16000 भाविक बद्रीनाथला, 13,000 केदारनाथला, 8000 गंगोत्रीला आणि 5000 भाविक यमुनोत्रीला दर्शनासाठी येत आहेत.