भाजपने २०१४ च्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन हॅक करुन विजय मिळवला होता, असा दावा काल सायबर एक्सपर्ट सय्यद शुजा याने लंडन येथील एका पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर आता भाजपतर्फे याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. कालची लंडन येथील पत्रकार परिषद ही बकवास असून जनतेने २०१४ साली दिलेल्या जनमताचा हा अपमान असल्याची टीका केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. भारताच्या संवैधानिक आणि स्वायत्त संस्थाना बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. तसेच काल झालेल्या आरोपांमुळे जागतिक स्तरावर भारताला बदनाम केले जात असल्याची टीका देखील रविशंकर प्रसाद यांनी केली.
काल लंडन येथे इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सय्यद शुजा याने ईव्हीएम मशीन हकिंगबाबत मोठा गौप्यस्फोट केला. त्यामुळे देशभरातले राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर ईव्हीएमबाबत पुन्हा एकदा चर्चा जोर धरू लागली होती. मात्र आज रविशंकर प्रसाद यांनी सय्यद शुजाचे आरोप फेटाळून लावले आहेत. या पत्रकार परिषदेत शुजाने कोणताही पुरावा दिलेला नाही, त्यामुळे त्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? असे रविशंकर म्हणाले आहेत. तसेच गोपीनाथ मुंडे हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते, त्यांच्याबाबत शुजाने केलेले वक्तव्य अपमानास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे वाचा – ..म्हणून झाली गोपीनाथ मुंडेंची हत्या? सायबर एक्स्पर्टचा धक्कादायक दावा!
रविशंकर पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांना २०१९ मध्ये आपला पराभव दिसत असल्याकारणाने ते अशाप्रकारचे षडयंत्र रचत आहेत. कालची पत्रकार परिषद ही आशिष रे यांनी घडवून आणली होती. काही दिवसांपूर्वी आशिष रे आणि यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती. त्यामुळे काँग्रेसचे हे षडयंत्र आम्ही नक्कीच उघडे पाडू, असा दावाही रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.
तसेच कालची पत्रकार परिषद ही कॅम्ब्रिज अॅनालिटिका भाग दोन होती का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जेव्हा भाजप पक्ष जिंकतो तेव्हाच ईव्हीएममध्ये खराबी असते का? इतरवेळी काय होते? त्याचप्रमाणे
२०१४ साली युपीएचे सरकार सत्तेवर होते, भाजपचे नाही. त्यामुळे भाजप अशाप्रकारचे फेरफार कसे करेल? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.