पाच राज्यातील निवडणुकांच्या मतमोजणीच्या निमित्ताने निवडणुक आयोगाला अखेर उशिरा का होईना, पण शहाणपण सुचले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांमधील मुख्य सचिवांना पत्र लिहितानाच निवडणूक निकालानंतरच्या विजयी जल्लोषावर बंदीच्या सूचना दिल्या आहेत. अनेक ठिकाणी निकालानंतर सुरू झालेला जल्लोष पाहता निवडणूक आयोगाने या सूचना दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने याआधीच दोन वेळा सूचना देऊनही असे प्रकार समोर आल्यानेच आयोगाने या प्रकारांवर नाराजी व्यक्त केली आहे. काही प्रसारमाध्यमांकडून दाखवण्यात आलेल्या विजयी जल्लोषाच्या वार्तांकनानंतरच आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. काही राज्यांमध्ये मतमोजणीच्या निकालानंतर विजयी जल्लोष सुरू होण्याचे प्रकार हे आयोगाच्या सूचनांच्या विरोधात असल्याचे मत आयोगाने मांडले आहे.
आयोगाने या निवडणूकांच्या मतमोजणीनंतरच्या सेलिब्रेशनची गंभीर दखल घेतली असून, त्याठिकाणी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या महामारीचे संकट पाहता अशा घटनांची पुनरावृ्ती होऊ नये असे पत्रच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारमधील मुख्य सचिवांना लिहिले आहे. निवडणूकांबाबत ज्या सूचना दिल्या आहेत, त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याच्या सूचना पत्राच्या माध्यमातून दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार या घडलेल्या प्रकारांना जबाबदार अधिकाऱ्याचे निलंबन तत्काळ करण्यात यावे, तसेच अशा अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर गुन्हादेखील दाखल करण्यात यावा असेही स्पष्ट करण्यात आले.