नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्यांना योग्य सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. पत्रात त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने अनेक मागण्या अमित शाह यांच्याकडे मांडल्या आहेत. खर्गे यांनी अमित शाहा यांना या प्रकरणात जातीने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव शुक्रवारी काँग्रेस खासदार राहुल गांधींनी त्यांची भारत जोडो यात्रा पुढे ढकलली होती. भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या या सुरक्षेतील दुर्दैवी त्रुटीबद्दस मी तुम्हाला हे पत्र लिहित असल्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. जे घडले त्याबद्दल तुम्हाला आधीच माहिती असेल. राहुल गांधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून शुक्रवारी यात्रा स्थगित करावी लागली. आम्ही जम्मू आणि काश्मीर पोलिसांची प्रशंसा करतो आणि त्यांनी या यात्रेचा समारोप होईपर्यंत संपूर्ण सुरक्षेची हमी दिली आहे, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
“We’re expecting a huge gathering to join the yatra over next 2 days&also the function tha’ll be held on Jan 30 at Srinagar…I shall be grateful if you could personally intervene & advise the concerned officials to provide adequate security,” Congress chief writes to Union HM. pic.twitter.com/9rn0NaCoPa
— ANI (@ANI) January 28, 2023
तथापि, भारत जोडो यात्रेत सर्वसामान्य मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत आणि राहुल गांधी यांच्याबरोबर जात आहेत, याची तुम्ही प्रशंसा कराल. या यात्रेत दिवसभरात किती लोक सहभागी होण्याची शक्यता आहे, हे आयोजक सांगू शकत नाहीत. कारण या यात्रेत सहभागी होण्यास सर्वसामान्य नागरिक उत्सुक आहेत, असे खर्गे यांनी या पत्रात म्हटले आहे.
येत्या दोन दिवसांत या यात्रेत लोक मोठ्या संख्येने सामील होण्याची अपेक्षा आहे. 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये होणाऱ्या समारोप सोहळ्याबाबत आमची खूप अपेक्षा आहे. 30 जानेवारी रोजी होणाऱ्या समारोप सोहळ्याला काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते आणि इतर महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. तुम्ही वैयक्तिकरीत्या यामध्ये लक्ष द्याल आणि सल्ला दिलात, तर मी आभारी राहेन. या यात्रेचा समारोप होईपर्यंत पुरेशी सुरक्षा पुरवावी, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, असेही मल्लिकार्जुन खर्गे यांनी या पत्रात म्हटले आहे.