जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. टेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच मायक्रोसॉफ्टने दोनशे कर्मचाऱ्यांना पदावरुन काढून टाकले होते. आता आणखी एक दिग्गज टेक कंपनी गुगलनेही कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. कर्मचार्यांच्या कामगिरीत सुधारणा न झाल्यास आणि पुढील तिमाहीचे आकडे अपेक्षेप्रमाणे नसल्यास कर्मचाऱ्यांनी पुढील परिणामासाठी तयार राहावे, असा इशारा गुगलकडून देण्यात आला आहे.
मागील जुलै महिन्यात गुगलने दोन आठवड्यांच्या भरती प्रक्रिया थांबवण्याबाबत सांगितले होते. जेणेकरुन ते कर्मचाऱ्यांच्या संख्येची समीक्षा करु शकतील. नंतर ही भरती प्रक्रिया २०२२ पर्यंत स्थगित करण्यात आली. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले होते की, हे स्पष्ट आहे की कंपनी आव्हानांना तोंड देत आहे.
ज्या प्रकारची आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्याला आपली उत्पादकता आणखी वाढवावी लागेल, असं पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले होते. गुगलची मूळ कंपनी Alphabetने एप्रिल-जून तिमाहीत अपेक्षेपेक्षा कमी कमाई आणि महसूल प्राप्त केला आहे. या तिमाहीत कंपनीच्या महसुलात केवळ १३ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे गुगलच्या उत्पन्नात घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गुगलने कर्मचाऱ्यांना इशारा दिल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा : सलमान रश्दींवरील हल्ल्यानंतर गुप्तचर संस्था सतर्क, नुपूर शर्मांचा धोका?