कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला जबर फटका बसला आहे. लोकांचा ऑक्सिजनअभावी, औषधांअभावी दुर्दैवी मृत्यू होत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस सातत्याने केंद्राच्या चुकांवर बोट ठेवत टीका करत आहे. या टीकांना भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उत्तर देताना काँग्रेस कोरोनाच्या काळात नकारात्मक राजकारण करत असल्याची टीका केली असून त्यांनी पाच पानांचं पत्रच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलं आहे. कांग्रेसच्या या वागण्याने आश्चर्यचकित झालेलो नाही परंतु निराश मात्र नक्की झालोय, असं नड्डा यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.
जे. पी. नड्डा यांनी त्यांच्या पत्रात कोरोनाच्या काळातील काँग्रेसच्या काही नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी लसींची खिल्ली उडवली. तसंच या संकटकाळात नकारात्मक राजनीती करत असल्याचं नड्डा यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.
कोरोनाच्या काळात राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांचे आचरण हे दुहेरी भूमिका आणि तुच्छतेसाठी लक्षात ठेवलं जाईल, असं नड्डा यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. भाजप अध्यक्षांनी त्यांच्या पत्रात लिहिलं आहे की – फेब्रुवारी, मार्चच्या आकडेवारीवरून कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यात कोणती राज्ये अपयशी आहेत आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त का आहे? हे लक्षात येईल.
लसीकरणातून केंद्राने हात झटकले
केंद्र सरकारने लसीकरणाची जबाबदारी झटकून राज्यांवर ती जबाबदारी सोपवल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. नुकत्याच विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेसची महत्त्वाची बैठक झाली. यावेळी बोलताना सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली.