काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर आता काश्मिरी पंडितांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. काश्मिरी पंडितांकडून सातत्याने न्यायाची मागणी केली जातेय. याविरोधात काश्मिरी पंडितांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शने केली आहेत. आमचा बळीचा बकरा म्हणून वापर करू नये, असं म्हणत काश्मिरी पंडित आपला संपात व्यक्त करत आहेत. यासोबतच या काश्मिरी पंडितांकडून बडगामच्या उपायुक्तांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जातेय.
दिल्लीच्या जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान काश्मीर समिती दिल्लीचे अध्यक्ष सुमीर चुंगू म्हणाले की, सरकार जर काश्मिरी पंडितांच्या परतण्याबाबत खरोखरच गंभीर असेल, तर सर्वप्रथम हे जाणून घेणे आवश्यक आहे की, काश्मिरी पंडित नरसंहाराचे बळी आहेत.
‘या’ आंदोलक काश्मिरी पंडितांच्या मागण्या काय?
अशा प्रकरणांचा वेगाने तसाप करण्यासाठी आणि गुन्हेगारांना शोधण्यासाठी नरसंहार आयोगाची स्थापना करा.
– नरसंहार प्रतिबंधक विधेयक आणा.
1991 च्या पनुन काश्मीर ठरावानुसार काश्मीरमध्ये वन प्लेस सेटलमेंट तयार करा.
बडगामच्या उपायुक्तांवर कारवाईची मागणी
पनुन काश्मीरचे ज्येष्ठ नेते विठ्ठल चौधरी यांनी बडगामच्या उपायुक्तांवर कठोर कारवाईची मागणी करत म्हटले की, राहुल भट्ट यांच्या जीवाला धोका असतानाही त्यांची बदली करण्यास उशीर केला. त्याचवेळी राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर झालेल्या निदर्शनादरम्यान काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या बडगामच्या एसपीवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
रूट्स इन काश्मीर कार्यकर्ते आशिष रझदान यांनी इशारा दिला की, जर सरकारने दोषींवर कारवाई केली नाही तर ते काश्मिरी पंडितांना वारंवार लक्ष्य करण्याच्या विरोधात देशव्यापी मोहीम सुरू करतील. आंदोलकांनी फलक आणि बॅनर हातात घेऊन आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. यासोबतच राहुल भट्ट यांच्या हत्येच्या निषेधार्थ फरीदाबाद-मथुरा रोडवर रॅलीही काढण्यात आली.