नवी दिल्लीः लव्ह जिहाद विरोधात महाराष्ट्रात झालेली आंदोलने आणि मोर्चे रोखण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कमी पडला, असे पत्र मुस्लिम नेत्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना लिहिले आहे.
सरसंघचालक भागवत यांना २३ मार्चला हे पत्र पाठवण्यात आले. दिल्लीचे माजी उप राज्यपाल नजीब जंग, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, माजी राज्यसभा सदस्य शाहिद सिद्दिकी, निवृत्त लेफ्टनंट जे. यू. शाह आमि सईद शेरवानी यांच्या सहीने हे पत्र भागवत यांना लिहिण्यात आले आहे. या सर्वांनी गेल्या वर्षी भागवतांची भेट घेतली होती. या भेटीनंतर हिंदू-मुस्लिम समूहातील तेढ दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते.
मुस्लिम विरोधी घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रक्षोभक भाषणे केली जात आहेत. छत्तीसगड आणि महाराष्ट्रात मुस्लिम विरोधी मोर्चे काढण्यात आले. मुस्लिमांकडून काहीही खरेदी न करण्याचे आव्हान या मोर्चांमधून करण्यात आले होते. हे अत्यंत चुकीचे आहे. तसेच मोहन भागवत यांची पुन्हा भेट घेण्याची ईच्छाही पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र मोहन भागवत हे पुढील काही महिने खूपच व्यस्त असल्याचे आरएसएस मुख्यालयातून सांगण्यात आले.
दरम्यान, श्रद्धा वालकर हत्येनंतर महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याची मागणी हिंदू संघटनांनी केली आहे. यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे निघाले. आंदोलने झाली. यासाठी मुंबईत निघालेल्या भाजप नेते आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, चित्रा वाघ, आमदार नितेश राणे, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रसाद लाड, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केशव उपाध्ये, खासदार गोपाळ शेट्टी, वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह शेकडो भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते, यासह मोर्चात मोठ्या संख्येने महिला देखील सहभागी झाल्या होत्या. जो हिंदू हित का काम करेगा, वही देश पे राज करेगा, गर्व से कहो हिंदू है, अशाप्रकारच्या घोषणा देण्यात आल्या होत्या.