घरताज्या घडामोडीAnil Deshmukh : सिल्वर ओक ते दिल्ली, कसे घडले राजीनामा नाट्य ?

Anil Deshmukh : सिल्वर ओक ते दिल्ली, कसे घडले राजीनामा नाट्य ?

Subscribe

महाविकास आघाडीत पायउतार झालेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रालयाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठली. पण या संपुर्ण राजीनामा नाट्यामध्ये देशमुखांच्या दिवसभरात अनेक बैठका झाल्या. सिल्वर ओक ते दिल्ली असा दिवसभरातील अनिल देशमुखांचा दिवसभराचा घटनाक्रम राहिला आहे. या कालावधीत अनेक घटना घडल्या आणि त्याचे पडसादही महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून आले. उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या निर्णयानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामाच्या तयारी केली. पण मुख्यमंत्र्यांना राजीनामा पोहचण्याआधीच हा राजीनामा सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यानंतर खुद्द अनिल देशमुख यांनीही आपल्या राजीनाम्याचे पत्र ट्विट करतानाच, फेसबुकवरही या पत्राची पोस्ट केली. एकुणच राज्यात या राजीनामा नाट्यामुळे विविध प्रतिक्रिया समोर आल्या. पण संध्याकाळी अनिल देशमुख यांनी थेट दिल्ली गाठल्यानेच सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. सायंकाळी त्यांच्या दिल्लीवारीच्या निमित्ताचा उलगडा होत गेला.

आणि उच्च न्यायालयाचा सीबीआय चौकशीचा निकाल आला

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर अॅड जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर १०० कोटी रूपये वसुलीचा आरोप केला होता. याच प्रकरणात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत सेंट्रल ब्युरो ऑफ इनवेस्टीगेशन (सीबीआय) ने चौकशी करावी, अशी मागणी अॅड जयश्री पाटील यांनी रिट केली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश देतानाच संपुर्ण प्रकरणात १५ दिवसांचा अहवाल सादर करण्याचेही स्पष्ट केले आहे. अनिल देशमुख्य गृहमंत्री असल्याने त्यांच्या अखत्यारीत महाराष्ट्र पोलिस आहेत, म्हणूनच या प्रकरणाची चौकशी योग्य प्रकारे होऊ शकत नाही असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांकडून झाला होता. या रिट याचिकेवर निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक येथील हालचाली वाढल्या. सिल्वर ओकवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीच्यावेळी त्याठिकाणी अजितदादा पवार, धनंजय मुंडे हेदेखील त्याठिकाणी उपस्थित होते. हायकोर्टाच्या सीबीआय चौकशीच्या मुद्द्यावरच अनिल देशमुख यांना पक्षाकडून सांगण्यात आले. पदावर राहून चौकशी करता येणार नसल्याचे सांगण्यात आल्यानेच अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांआधीच समाजमाध्यमांवर राजीनामा व्हायरल

 

अनिल देशमुख यांना पक्षाकडून राजीनामा देण्याचे सांगण्यात आल्यानंतर अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा लिहिला. अनिल देशमुख राजीनामा देणार आहेत, त्याबाबतची माहितीही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. त्यानंतरच अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचे ट्विट करण्यात आले. अनिल देशमुख यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्रच ट्विट केले. त्यानंतर हे पत्र फेसबुकवरही शेअऱ करण्यात आले. अनिल देशमुख हे आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे घेऊन घेले. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांची या संपुर्ण प्रकरणात प्रतिक्रिया मागितल्यावर अनिल देशमुख यांनी गप्प राहणे पसंत केले. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्षाकडून तत्काळ प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनीही या संपुर्ण प्रकरणात नैतिकतेने राजीनामा देण्यात अनिल देशमुख यांनी उशिर केल्याची प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

दिल्लीवारीचे हे होते निमित्त

अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिल्यानंतर संध्याकाळी ते दिल्लीला रवाना झाले. दिल्लीमध्ये अनिल देशमुख हे उच्चपदस्थ नेत्यांना भेटणार अशी चर्चा सुरू होती. पण काही वेळानंतर स्पष्ट झाले की, अनिल देशमुख हे सीबीआय चौकशीच्या हायकोर्टाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी पोहचले आहेत. अनिल देशमुख यांनी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी दुपारपासूनच सुरूवात केली होती. त्यांचा दिल्ली दौरा हा त्याच भाग होता. अनिल देशमुख यांनी मुंबईतून ५ वाजता दिल्लीसाठीची फ्लाईट घेतली. अनिल देशमुख यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचा खुलासा लवकरच होऊ शकतो अशीही माहिती आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -