नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषींपैकी एक ए. जी. पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पेरारिवलनची मुदतपूर्व सुटका करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर नलिनी श्रीहरन, मरुगन आणि एका श्रीलंकन नागरिकासह या प्रकरणातील अन्य सहा दोषींच्या सुटकेची आशाही पल्लवित झाली आहे.
याआधीच्या सुनावणीत केंद्र सरकारने राजीव गांधी हत्येप्रकरणी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा भोगत असलेल्या ए. जी. पेरारिवलन यांचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे पाठवण्याच्या तामिळनाडूच्या राज्यपालांच्या निर्णयाचा बचाव केला होता. न्यायालयात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) के. एम. नटराज यांनी न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा यांनी सांगितले की, केंद्रीय कायद्यानुसार दोषी ठरलेल्या व्यक्तीची शिक्षा, माफी आणि दया याचिकेवर केवळ राष्ट्रपतीच निर्णय घेऊ शकतात.
सात जणांना ठरवले दोषी
राजीव गांधी हत्येप्रकरणी सात जणांना दोषी ठरवण्यात आले होते. सर्व दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ती जन्मठेपेत बदलली. त्यानंतरही दिलासा न मिळाल्याने दोषींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
जयललिता यांनी सुटकेची शिफारस केली होती
2016 आणि 2018 मध्ये जे. जयललिता आणि ए. पलानीस्वामी यांच्या सरकारने दोषींच्या सुटकेची शिफारस केली होती. परंतु त्यानंतरच्या राज्यपालांनी त्याचे पालन केले नाही, त्यामुळे अखेर राष्ट्रपतींकडे पाठवले. दीर्घकाळ दयेच्या अर्जावर निर्णय न झाल्याने दोषींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
Supreme Court orders release of AG Perarivalan, one of the convicts serving life imprisonment in connection with the assassination of former Prime Minister Rajiv Gandhi.
— ANI (@ANI) May 18, 2022
21 मे 1991 ला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 21 मे 1991 ला तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदुर येथे हत्या करण्यात आली आणि 11 जून 1991 रोजी पेरारिवलन यांना अटक करण्यात आली. घटनेच्या वेळी पेरारिवलन 19 वर्षांचे होते आणि गेल्या 31 वर्षांपासून तुरुंगात होते.
या हत्याकांडात पेरारिवलनची भूमिका काय होती?
21 मे 1991 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदुर येथे एका जाहीर सभेदरम्यान हत्या करण्यात आली होती. यानंतर 11 जून 1991ला पेरारिवलनला अटक करण्यात आली. हा आत्मघातकी हल्ला होता. पेरारिवलननेच बॉम्बस्फोटासाठी वापरलेल्या दोन 9 व्होल्ट बॅटरी विकत घेतल्या आणि त्या मास्टरमाइंड शिवरासनला दिल्या. पेरारिवलन यांना टाडा न्यायालयाने 1998 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. नंतर या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. 1999 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर 2014 मध्ये फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. तामिळनाडू सरकारच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयाने या वर्षी मार्चमध्ये पेरारिवलन यांना जामीन मंजूर केला होता. मात्र केंद्र सरकारने त्यांच्या याचिकेला विरोध केला. तमिळनाडूच्या राज्यपालांनी हे प्रकरण राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडे पाठवले असून त्यांनी अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.
हेही वाचाः हार्दिक पटेलचा काँग्रेसमधून राजीनामा, पक्षाला मोठा धक्का