पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पक्षाचे अनेक नेते सातत्याने ईडीच्या रडारवर येत आहे. यात आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कोळसा घोटाळा प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जींना समन्स बजावला आहे. ईडीने अभिषेक बॅनर्जींना 2 सप्टेंबर रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी सोमवारी एका कार्यक्रमात भाजपवर निशाणा साधत अंदाज व्यक्त केला होता की, केंद्रीय एजन्सी त्यांचा पुतण्या आणि इतर वरिष्ठ नेत्यांना नोटीस पाठवू शकते.
दरमयान21 मार्च रोजी अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीची ईडीने दिल्लीत आठ तासांहून अधिक वेळ या प्रकरणासंदर्भात चौकशी केली होती, त्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत कोलकत्ता येथे चौकशी करण्याची विनंती केली. सुप्रीम कोर्टाने त्यांची विनंती मान्य करत ईडीला कोलकाता येथे त्यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले. अभिषेक बॅनर्जी यांच्या निकटवर्तीयांच्या माहितीनुसार, अभिषेक बॅनर्जी यांना कोणताही समन्स मिळालेले नाही, पण जर त्यांना समन्स पाठवण्यात आला त्यांना चौकशीला सामोरे जावे लागेल.
दरम्यान या प्रकरणावर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, अभिषेकने आज चांगले भाषण केले, त्यामुळे त्यांना उद्या ईडी किंवा सीबीआय बोलावू शकते. यापूर्वी त्यांना नोटीस बजावण्यात आली होती, त्यांच्या पत्नीलाही नोटीस देण्यात आली. आता मला वाटतं त्यांच्या मुलालाही बोलावलं जाईल. जेव्हा ते तुम्हाला चौकशीसाठी बोलवतील तेव्हा तुमच्या मुलालाही सोबत न्या, त्यांना देखील समजेल की, दोन वर्षांचा मुलगा किती मजबूत आहे.
याशिवाय अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, “आम्ही एवढी मोठी रॅली काढत आहोत, ज्यावरून ते चार-पाच दिवसांत काहीतरी करतील, असे मी लेखी देऊ शकतो. आम्ही झुकणार नाही. यापूर्वी अभिषेक बॅनर्जी यांची ईडीने दोनदा चौकशी केली आहे.