देशात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू आहे आणि ३ मे नंतर लॉकडाऊन वाढवावा की नाही, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व मुख्यमंत्र्यांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनीही पंतप्रधानांना लॉकडाऊनबाबत आपलं मत सांगितलं.
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी ३ मेनंतरही मेघालयात लॉकडाऊन चालू रहावं असं आमच्या सरकारला वाटतं, असं कोनराड संगमा म्हणाले. तथापि, संगमा यांनी असंही म्हटलं आहे की, जे भाग ग्रीन झोनमध्ये आहेत किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित नाही, त्यांना नंतर थोडा दिलासा मिळाला पाहिजे. विशेष बाब म्हणजे मेघालयमध्ये खूप कमी कोरोनाचे रुग्ण आहेत. मेघालयमध्ये कोरोनाचे फक्त १२ रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा – व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये काय म्हणाले मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना? वाचा सविस्तर!
मेघालयच्या खालोखाल गोवा, पुदुच्चेरी, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम ही एकमेव अशी छोटी राज्ये आहेत जिथे कोरोनाचा सर्वात कमी प्रभाव आहे. असं असूनही, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्याच्या बाजूने मेघालयचे मुख्यमंत्री आहेत. मेघालयव्यतिरिक्त ओडिशानेही लॉकडाऊन वाढवण्यास सहमती दर्शवली आहे.
केंद्र सरकारने या संपूर्ण प्रकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसला तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठकीत स्पष्टपणे सांगितलं की ही दीर्घ लढाई आहे आणि लॉकडाऊन योग्य पद्धतीने पाळले पाहिजे. त्याचबरोबर, या व्यतिरिक्त, केंद्र सरकारच्या वतीने असंही म्हटलं आहे की लॉकडाऊनमध्ये मदत कशी मिळू शकते याविषयी राज्यांनी आपापले धोरण तयार करावं.