देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील असंतोष संपत नाहीये. पक्ष संघटन मजबूत करण्याचा जितका प्रयत्न आहे. तितकेच काँग्रेसचे संकट अधिक गडद होत चालले आहे. राष्ट्रीय प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी गांधी कुटुंबावर गंभीर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला. आता पक्षाचे सर्वात तगडे नेते गुलाम नबी आझाद यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. गेल्या आठ वर्षांत 400 हून अधिक नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. यामध्ये जवळपास 33 बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. परंतु प्रियंका गांधींच्या प्रवेशानंतर स्थिती बिघडली असल्याचे कारण सांगितले जात आहे.
प्रियंका गांधींच्या प्रवेशानंतर परिस्थिती बिघडली
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा, त्यांचे भाऊ राहुल गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्यासोबत अनेक दिवसांपासून राजकीय व्यासपीठावर उपस्थिती लावत आहेत. 23 जानेवारी 2019 रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वी, प्रियंका वाड्रा यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून सक्रिय राजकारणाला सुरुवात केली.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर पक्षात बंडखोरी सुरू झाली. प्रियंका गांधी यांच्या प्रवेशामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुका आणि संघटना मजबूत होईल, अशी पक्षाला आशा होती. परंतु नेमके याचे उलटे झाले. 2014 ते 2018 या चार वर्षात पक्षाच्या 10 प्रमुख नेत्यांनी राजीनामे दिले होते. प्रियंका गांधी यांच्या प्रवेशानंतर गेल्या चार वर्षांत 23 बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे.
2022 मध्ये काँग्रेसला सर्वाधिक फटका
2022 हे वर्ष काँग्रेससाठी सर्वात वाईट वर्ष ठरत आहे. 2022 ला आठ महिनेही पूर्ण झाले नाहीत आणि आतापर्यंत 12 बड्या नेत्यांनी असंतोषामुळे काँग्रेस सोडली आहे. यामध्ये सर्वात अलीकडचे नाव गुलाम नबी आझाद यांचे आहे.
हेही वाचा : …लवकरच ऑपरेशन लोटसवर खुलासा करणार, अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा