लग्नानंतर शरीरसंबंध ठेवायची इच्छा नसेल तर नवरा- बायको दोघेही शरीरसंबंधाला नकार देऊ शकतात, असे मत आज दिल्ली हायकोर्टाने नोंदवले आहे. ‘लग्नानंतर बायकोला शरीर संबंधांसाठी जबरदस्ती म्हणजे गुन्हा’ या याचिकेवरील सुनावणीदरम्यान आज दिल्ली हायकोर्टाने काही महत्त्वपूर्ण नोंदी केल्या आहेत. लग्नानंतर शरीर संबंध हा दोघांच्या संमतीने व्हायला हवा, असे सांगत अनेक मुद्द्यांवर कोर्टाने प्रकाशझोत टाकला आहे.
नेमकं प्रकरण काय?
लग्नानंतर नवरा शरीरसंबंधासाठी त्रास देत असेल तर असे शरीरसंबंध हा गुन्हाच आहे, अशी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल झाली होती. या याचिकेला विरोध करणारी याचिका मेन वेल्फेअर ट्रस्ट या सेवाभावी संस्थेकडून दाखल करण्यात आली होती. शरीरसंबंध आणि गुन्हा या दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्याचे या याचिकेत म्हटले होते. कारण शरीरसंबंध करताना कायद्याचे भंग झाल्यास हा गुन्हा समजावा असे यात नमूद करण्यात आले होते. त्यात शरीरसंबंधासाठी जबरदस्ती आणि धमकी देणे या गोष्टी येतात असे त्यांनी म्हटले होते.
कोर्ट काय म्हणतयं?
- दोन्ही याचिकाकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने काही मुद्दयांवर प्रकाशझोत टाकत त्यांची नोंद केली. लग्न झाले म्हणून बायको ही शरीरसंबंधासाठी हक्काची आहे, हे म्हणणे चुकीचे आहे.
- बलात्काराची व्याख्या ही वेगळी असून नवऱ्याने बायकोला शरीर संबंधासाठी मारणे म्हणजे बलात्कार होऊ शकत नाही.
- शिवाय मनाविरुद्ध शरीरसंबध ठेवल्यानंतर जर शरीरावर जखमा झाल्या नाहीत म्हणजे तो बलात्कार नाही,असेही म्हणणे चुकीचे आहे.
महिलांना न्याय देणारे अनेक कायदे
महिलांना सुरक्षा देणारे अनेक कायदे देशात आहेत. कौटुंबिक हिंसाचार, महिला अत्याचार या संदर्भात सुरक्षा दिली जाते. महिलांना सुरक्षा देणारे कलम ३७५ असताना आता नव्या कायद्याची गरज काय ? असा प्रश्न मेन वेल्फेअर ट्रस्टकडून देण्यात आला ज्यावर कोर्टाने या कायद्याची गरज काय?,असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला आहे.
पुढील सुनावणी ८ ऑगस्टला
याचिकेवरील सुनावणी दरम्यान आज कोर्टाने अनेक मुद्दयांची नोंद केली. पण अंतिम निर्णय दिला नाही. त्यामुळे आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर नेमका निर्णय काय होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.