केंद्र सरकारने सैन्यासाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. योजना घोषित केल्याच्या दुसऱ्याच दिवशी तरुणांनी सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. योजनेमध्ये काही त्रुटी असल्याचे या तरुणांचे मत आहे. बिहारमध्ये तरुणांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून रेल्वेची जाळपोळ करण्यात आली आहे. तर महामार्गसुद्धा रोखण्यात आले आहेत. अग्निपथ योजनेविरोधात देशभरातील तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन केले असून ही योजना रद्द करण्याची मागणी केली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्यातील सेवेसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेमध्ये सैन्यात काम करणाऱ्या तरुणांना चार वर्षांची सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे. ४ वर्षांसाठी जवानांची नियुक्त करण्यात येणार आहे. तर यामधील २५ टक्के जवान हे पुढील १५ वर्षांसाठी लष्करी सेवेत दाखल होतील. मात्र ७५ टक्के जवानांना निवृत्ती देण्यात येणार आहे. योजनेतील या नियमावरुन गदारोळ सुरु झाला आहे.
अग्निवीर योजनेवरुन बिहारमधील छपरा जिल्ह्यातील तरुण आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन सलग दुसऱ्या दिवशी सुरुच आहे. बिहारमध्ये अनेक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. परंतु आंदोलनाला हिंसक वळण लागले असून रेल्वेची जाळपोळ करण्यात आली आहे. एका एक्सप्रेसच्या कोचवर लाठीमार आणि दगडफेक करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातवारण निर्माण झालं आहे.
#WATCH | Youth hold protest in Jehanabad over the recently announced #AgnipathRecruitmentScheme for Armed forces. Rail and road traffic disrupted by the protesting students. pic.twitter.com/iZFGUFkoOU
— ANI (@ANI) June 16, 2022
हरयाणामध्ये महामार्ग रोखण्यात आला
बिहारमध्ये अग्निवीर योजनेविरोधात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे पडसाद आता हरयाणामध्येसुद्धा उमटत आहेत. तरुणांनी हरयणामध्ये आंदोलन केलं आहे. दिल्ली-जयपूर महामार्गावर रस्ता रोखण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. राष्ट्राय महामार्गावर आंदोलन करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
संतप्त तरुणांनी मोठ्या प्रमाणात अग्निवीर योजनेला विरोध केला आहे. या योजनेला विरोध दर्शवण्यासाठी केंद्र सरकारविरोधात तरुण रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी आणि गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी आरा जिल्ह्यात अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. रेल्वे स्थानकांवर तरुणांनी आंदोलन केले होते. या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आहे. काही ठिकाणी तरुणांनी टायर जाळून विरोध केला आहे.
अग्निपथ योजनेला विरोध का?
अग्निपथ योजनेत सेवा बजावणाऱ्या जवानाला अग्निवीर म्हणून संबोधण्यात येणार आहे. परंतु या अग्निपथ योजनेला विरोध का दर्शवण्यात येत आहे? याबाबत आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी माहिती दिली आहे. सैन्य भरतीसाठी प्रयत्न आणि तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनच या योजनेला विरोध करण्यात येत आहे. बिहारमधील छपरामध्ये आंदोलनाची ठिणगी पडली आहे. तणावपूर्ण वातवारण निर्माण झालं आहे. विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे की, आम्ही सैन्यात भरती होण्यासाठी फार मेहनत घेतो. परंतु अग्निपथ योजनेतून सैन्य दलात केवळ ४ वर्ष सेवा देऊ शकतो. यामध्येच तरुणांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे. सुट्टीचाही समावेश करण्यात येणार आहे. यामुळे सर्व सोडून केवळ ३ वर्षांची सेवा असेल. काही महिन्यांच्या ट्रेनिंगवरुन आम्ही देशाची सुरक्षा कशी काय करु शकतो. केंद्र सरकारने योजना मागे घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. चार वर्ष सेवा केल्यानंतर आम्ही पुढे काय करणार याबाबत केंद्र सरकारकडे प्रश्न नाही असे विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : राष्ट्रपतीपदासाठी 11 उमेदवारांचा अर्ज दाखल, भाजपकडून सस्पेन्स कायम