एकीकडे कोरोनाचे संसर्ग असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात वादळी पावसानेही धुमाकूळ घातला आहे. काल दुपारपासून उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह, वीजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. या वादळामुळे १४ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामध्ये सीतापूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर पूर्वांचलमध्ये तीन जणांचा आपले प्राण गमवावे लागले आहेत. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
आधीच देशात कोरोनाचा संसर्ग होत असताना अशावेळी पाऊस पडणे ही धोक्याची घंटा आहे. पावसाच्या वातावरणामुळे हवेतील विषाणुंचा प्रादुर्भाव जलद गतीने होते. त्यामुळे उत्तर प्रदेशचे हे वातावरण कोरोनासंबंधी मारक ठरण्याची भिती व्यक्त होत आहे. सीतापूरमध्ये काही ठिकाणी घरांचे छप्पर पडल्याने तर हरगावच्या परिसरात वीज पडून एकाचा मृत्यू झाला. लहरपूर कोतवाली भागात वादळवाऱ्याने झाड पडून तर रामपुरकलात भिंती पडल्याने एकाला जीव गमवावा लागला. तर वेगवेगळ्या परिसरात तीन जण जखमी झाले आहेत. हरदोईमध्ये झाड पडल्याचे एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे.