पाकिस्तानाच मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान पदी असलेल्या इम्रान खान यांना पायउतार व्हावे लागले आहे. त्यानंतर आता माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू आणि पीएमएल (एन) पक्षाचे नेते शहबाज शरीफ यांच्याकडे देशाची सूत्रे असणार आहेत. शहबाज शरीफ पंतप्रधान झाल्यानंतर पाक भारत संबंधांवर कसा परिणाम होईल याचीही चर्चा त्यानिमित्ताने सुरू झाली आहे. शरीफ यांच्या कार्यकाळातही पाककडून काही वेगळी पावल उचलली जाण्याची शक्यता कमी आहे. पण पंतप्रधान पदाचे नामांकन भरताच त्यांनीही काश्मीरच्या मुद्द्यावर राग आळवला आहे. याआधीच्या पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनीही काश्मिरचा मुद्दा छेडला आहे.
आम्हाला भारतासोबत शांतीचे वातावरण हवे आहे. पण त्यासाठी काश्मिरचा मुद्दा सोडवावा लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या सेनेच्या भीतीमुळे प्रत्येक राजकीय पक्ष काश्मिरच्या मुद्द्यावरून भारतावर टीका करत आला आहे. पाकिस्तानची सेनादेखील याच मुद्द्यावर देशाच्या अर्थसंकल्पातील मोठी आर्थिक तरतूद संरक्षण क्षेत्रासाठी करत असते. त्यामुळे पाकिस्तानच्या सैन्यासोबत चांगले संबंध निर्माण करणे हे शहबाज शरीफ यांच्यासमोरील आव्हान आहे. त्यांचे मोठे बंधू नवाज शरीफ यांचेही संबंध पाकिस्तानी लष्करासोबत फार चांगले राहिलेले नाहीत. त्यामुळे पाकिस्तानच्या लष्करासोबत त्यांना जुळवून घ्यावे लागणार आहे.
शहबाज शरीफ हे राजकारणात नवे नाहीत. त्यांच्या पाठीशीही चांगलाच राजकीय अनुभव आहे. तसेच सरकार चालवण्याचा तसेच राजकारणातील दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. अशी स्थिती असली तरीही पाकिस्तानमध्ये सरकारमध्ये असलेल्या कोणत्याही मोठ्या नेत्याला सत्ता टिकवण्यावरून कायमच अस्थिरतेच्या मुद्द्याचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे पाकिस्तानात सरकारची शाश्वती हा कळीचा मुद्दा राहिलेला आहे.
कसे आहे शहबाज शरीफ यांचे राजकीय करिअर
– ७० वर्षीय शहबाज शरीफ हे पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज पक्षाचे खासदार आहेत
– पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे छोटे बंधू आहेत
– २०१८ मध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार राहिले आहेत
– १९८० राजकारणात पदार्पण केल्यानंतर त्यांनी १९८८ मध्ये पहिली निवडणूक जिंकली
– १९९७ मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले, त्यानंतर २००८ आणि २०१३ मध्येही ते पंजाबचे मुख्यमंत्री राहिले
– नवाज शरीफ यांना पदावरून हटवल्यानंतर त्यांना पीएमएल-एन चे अध्यक्षपद देण्यात आले